मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मित्र मिळाला तरी तो पहिलवान असला पाहिजे कुपोषित बालकांबरोबर मैत्री करून काय फायदा, आपची महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे आपल्याला माहीत असे सांगत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केजरीवाल ठाकरे भेटीवर चिमटा काढला. मालेगाव येथील झोडगे येथे पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता गुलाबराव पाटलांनी ही टीका केली.
शुक्रवारी आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे होते. या भेटीनंतर ठाकरे-केजरीवाल यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याच भेटीवर मंत्री पाटील यांनी चिमटा काढला..
काय बोलले होते केजरीवाल
शुक्रवारच्या भेटीनंतर केजरीवाल म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या पक्ष, चिन्ह आणि नावाची चोरी झाली. पण, बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते. उद्धव ठाकरे हे त्या वाघाचे सुपुत्र आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालय नक्की न्याय देईल अशी अपेक्षा आहे. पुढे ते म्हणाले की, नेहमी विजय सत्याचाच होतो. भाजपला गुंडगिरीशिवाय काही येत नाहीय यामुळे देश पुढे जाणार नाही. दिल्लीतील जनतेने आम्हाला बहुमत दिले, तरीही दिल्लीत महापौर बसवायला आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. या देशात भाजप हा एकच पक्ष आहे जो २४ तास निवडणुकीबद्दल विचार करतो, असा टोलाही त्यांनी लगावला.केजरीवाल पुढे म्हणाले की, आम्ही देशाच्या विकासाच्या मुद्द्यांवर विचार करतो. ईडी आणि सीबीआयचा वापर हे भित्रे लोक करतात. भाजपवाले ज्या लोकांना घाबरतात त्यांच्याविरोधात या तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. आम्ही काही केलं नाही, त्यामुळे आम्ही घाबरत नाही, शेवटी सत्याचाच विजय होईल, असे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले.