जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. दोन्ही राज्यांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या ‘महाकाय पुनर्भरण योजना’ प्रकल्पाला लवकरच अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला.
नाबार्डच्या अधिकाऱ्यांशी आर्थिक तरतुदीबाबत चर्चा केली. लवकरच या प्रकल्पाला मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मध्यप्रदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे.
या प्रकल्पामुळे जळगाव जिल्ह्याला फायदा*
या प्रकल्पामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा व विदर्भातील काही तालुके तसेच मध्यप्रदेशातील बुरहाणपूर व खकनार या तालुक्यांना लाभ मिळणार आहे. सुमारे ३५७७८८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. १९२४४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याची माहितीही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.