इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखाद्या घटनेपेक्षा अफवा अधिक भयानक असतात, त्यामुळे दुर्घटना घडू शकतात. मनुष्य हा अनेक प्राण्यांना घाबरतो. त्यापैकीच सापाला तर सर्वजणच घाबरतात. अरे बापरे साप! असे नुसते म्हटले तरी अनेक जण भीतीने अर्ध मेले होतात. साप आल्याची अफवा पसरल्याने उत्तर प्रदेशातील एक अशीच दुर्घटना घडली, ती देखील नदीतून प्रवास करणाऱ्या बोटीमध्ये. वास्तविक पाहता ती एक अफवा होती. मात्र त्यामुळे गोंधळ उडून सतरा जण पाण्यात पडले आणि त्यापैकी सात जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशमधील गाझीपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका बोटीतून 17 जण प्रवास करत होते, त्यावेळी अचानक त्या बोटीमध्ये साप शिरला. सापाबद्दल समजताच होडीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे बोटीचा समतोल ढळला गेला आणि ती पाण्यात उलटली. या दुर्घटनेत 17 जण बुडाले. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. पाच जणांचे मृतदेह हे हाती आले आहेत.
त्यानंतर गंभीर झालेल्या एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची तब्येत बरी झाल्यानंतर व्यक्तीला घरी सोडण्यात आले.
बुडालेल्या काही जणांचा शोध घेण्याचं काम अजूनही सुरू असल्याचे एनडीआरएफच्या टीमकडून सांगण्यात आले. वाईट गोष्ट म्हणजे मृतांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश असल्याचे कळते आहे. तिचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या बोट दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची आर्थिक मदत राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.
Gazhipur Accident Boat Sunk 7 Death
Uttar Pradesh Sneak