मुकुंद बाविस्कर, मुंबई
ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नाव आणि भूमिका कधीही विसरता येणार नाही. ते अप्रतिम आणि प्रसिद्ध कलाकारांपैकी एक होते. कादर खान यांनी कोणत्याही चित्रपटात कोणतीही व्यक्तिरेखा स्वीकारली तरी त्याची छाप मोठ्या पडद्यावर कायम राहिली. खलनायकापासून ते कॉमेडियनपर्यंत त्यांनी चित्रपटांमध्ये आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
एक चांगला कलाकार असण्यासोबतच कादर खान हे एक चांगले संवाद लेखक देखील होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सदाबहार संवादही लिहिले आहेत. त्यांचा जन्म दि. २२ ऑक्टोबर १९३७ रोजी अफगाणिस्तान काबुल येथे झाला. त्यानंतर त्यांचे कुटुंब अफगाणिस्तान सोडून भारतातील मुंबई येथे स्थायिक झाले. तेव्हा कादर खानचे कुटुंब मुंबईतील सर्वात अस्वच्छ आणि कुप्रसिद्ध भागात असलेल्या कामाठीपुरा येथे राहत होते.
कादर खान यांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यानंतर त्यांनी अभ्यास सुरू केला. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर कॉलेजमध्ये नाटके लिहायला सुरुवात केली. काही काळानंतर कादर खान एका कॉलेजमध्ये लेक्चरर झाले, पण कादर खान यांनी नाटके लिहिणं थांबवलं नाही आणि लवकरच त्यांनी चित्रपटांसाठी संवाद लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला कादर खान यांनी अनेक चित्रपटांसाठी उत्कृष्ट संवाद लिहिले.
काही काळानंतर कादर खान यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. कादर खानने आपल्या करिअरच्या सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली. त्यांच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. पण एक वेळ अशी आली की, कादर खानने खलनायकाची भूमिका बंद केली होती. कुटुंब आणि शाळा, कॉलेजात जाणाऱ्या त्यांच्या मुलांमुळे त्यांनी खलनायकाची भूमिका न करण्याचा निर्णय घेतला.
कारण कादर खान जेव्हा चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत असायचे तेव्हा त्यांच्या मुलांना शाळेतील इतर विद्यार्थी छेडत असत. एकदा वडिलांच्या खलनायकाच्या भूमिकेवरून त्यांचा मुलगा सर्फराजचे भांडण झाले होते. त्याचवेळी कादर खानच्या पत्नीनेही त्यांना चित्रपटांमध्ये खलनायक बनण्यापासून रोखण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर कॉलेजचे माजी विद्यार्थी जेव्हा कादर खानला भेटत, तेव्हा ते त्याला खलनायकाची भूमिका न करण्याचा सल्ला द्यायचे.
यानंतर कादर खान यांनी चित्रपटातील खलनायकाची भूमिका सोडून कॉमेडी करायला सुरुवात केली.
गोविंदासोबत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये कॉमेडी केली. प्रेक्षकांना ती चांगलीच आवडली होती. कादर खानने आपल्या कारकिर्दीत दाग, परवेश, सुहाग, कुर्बानी, नसीब, याराना, कुली, आंटी नंबर 1, दुल्हे राजा, आंखियों से गोली मारे आणि दीवाना मैं दीवाना यासह सुमारे 300 चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि सुमारे 250 चित्रपटांसाठी संवाद लिहिले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या बहुतेक चित्रपटांचे संवाद लिहिले आहेत.