नाशिक – देशासह विदेशातून अन्नपदार्थ आयातीसाठी केंद्र शासनाच्या अन्न आणि सुरक्षा व मानक प्राधिकारणाने देशभरातील सात सेंटरला मान्यता दिली आहे. त्यात नाशिकच्या तीन सेंटरचा समावेश आहे. यामुळे आता महामार्गाद्वारे अन्नपदार्थाची वाहतूक करावयाची असल्यास अंबड येथील सेंटरवर माल उतरवता येणार आहे. कार्गो हवाई सेवेद्वारे व समुद्रामार्गे अन्नपदार्थ आल्यास ओझरजवळील,जानोरी येथील सेंटरला पदार्थ उतरविता येणार आहे. अन्नपदार्थाचे सेंटर नाशिकला झाल्याने उत्तर महाराष्ट्रांतील उद्योग व व्यवसायिकांना फायदा होणार आहे. अन्नपदार्थ इंपोर्टसाठी त्यांना मुंबईला जाण्याची गरज पडणार नसल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
पुणे, मुंबई आणि नाशिक हा राज्यांचा विकासासाठी महत्वाचा सुवर्ण त्रिकोण आहे. या तीन शहरांमध्ये जितके प्रकल्प आणि सोयी-सुविधा होतील त्याचा लाभ त्या जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांना होत असतो. या सकारात्मक भूमिकेतून खा. हेंमत गोडसे यांनी गेल्या काही दिवसांपासून अन्नपदार्थ आयात करण्यासाठी नाशिक येथे अन्नपदार्थ सेंटर व्हावे यासाठी प्रयत्न सुरु केले होते. मागील वर्षी खासदार गोडसे यांनी तात्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेउन त्यांना अन्नपदार्थ आयातीसाठी नाशिक येथे सेंटर होणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले होते. तुमची मागणी योग्य असून त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही गोडसे यांना दिली होती.
अन्न पदार्थ आयात सेंटर नाशिक येथे व्हावे यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने नुकतेच देशातील सात सेंटरला मान्यता दिली आहे. यामध्ये नाशिक येथील तीन सेंटरचा समावेश आहे. याविषयीचे पत्र अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंगल यांनी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क, डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड आणि वाणिज्य विभागाला दिले आहे. शासनाने मंजूर केलेले तिन्ही सेंटर लवकरच कार्यान्वित होणार आहेत. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर येथील व्यापा-यांना अन्नपदार्थ इम्पोर्ट करण्यासाठी यापुढे मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही. उद्योग, व्यवसायिकांना आपला माल मुंबई ऐवजी थेट नाशिक येथील सेंटरवर मागविता येणार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे.