इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत अक्षय कुमारचे नाव कायम आघाडीवर असते. बॉलिवूडमधला हा खिलाडी वर्षभरात तीन ते चार चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. कॉमेडी, ऍक्शन, ड्रामा अशा सगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत असलेला अक्षय प्रेक्षकांचा आवडता नायक आहे. समाजभान असल्याने देखील तो लोकप्रिय आहे. तरीही गेल्या वर्षापासून अक्षयचे चित्रपट फ्लॉप होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अक्षयने एक मोठा निर्णय घेण्याचे ठरवले लवकरच त्याबाबत तो घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे.
सतत फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांमुळे खिलाडी अक्षय कुमारवर अनेकांनी निशाणा साधला आहे. काहींनी वेगवेगळ्या पध्दतीने अक्षयला टार्गेट करण्यास सुरुवात केली. यावर अक्षय म्हणाला की, मी सकाळी का लवकर उठतो, रात्री का लवकर झोपतो, मी वर्षभरात एवढ्या चित्रपटात काम का करतो हे सर्व प्रश्न मला सातत्याने विचारले जात आहेत. मात्र मला कुणी असा माणूस दाखवा की, ज्याला चांगल्या संधी मिळत आहेत. तरीही तो काम करणार नाही. जर तुम्हाला चांगल्या संधी मिळत असतील तर कोणीच काम करणे सोडणार नाही. आणि संधीच सोन करायला मला आवडतं, असे त्याने स्पष्ट केले.
अक्षय पुढे म्हणाला की, मला स्वतः मध्ये काही बदल करायचे आहेत, त्यासाठी मी प्रयत्न करतोय. कोरोनानंतर सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत. प्रेक्षकांनी थिएटरकडे पाठ फिरवली आहे. परंतु, यामध्ये प्रेक्षकांची अजिबातच चूक नाही. प्रेक्षकांना चित्रपटाशी कसे जोडून ठेवता येईल, यावर मला काम करायचे आहे. अक्षय कुमार म्हणाला की, मी अगोदर म्हटल्याप्रमाणे कोरोनानंतर खरोखर काही गोष्टी बदलल्या आहेत. यामुळेच मी माझे मानधन कमी करण्याचा विचार करतोय. यामुळे चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि टीमवर येणारा भार थोडा तरी कमी होईल अशी आशा अक्षयने व्यक्त केली आहे. दरम्यान, महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय कुमार मराठी चित्रपट सृष्टीत लवकरच पदार्पण करत आहे. या चित्रपटात अक्षय कुमारला पाहायला त्याचे चाहते उत्सुक आहेत.
Flop Film Actor Akshay Kumar Big Announcement