विशेष प्रतिनिधी, दिल्ली
आपल्या देशात कोणत्याही निवडणुकीत तिकीट म्हणजेच उमेदवारी देताना प्रचंड प्रमाणात पैशांचा गैरव्यवहार होतो, हे आता जगजाहीर झाले आहे. बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि त्यांची बहीण मीसा भारती याच प्रकरणामुळे अडचणीत आले आहे. न्यायालयाने या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा, यांच्यासह तीघांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या ५ जणांवर सुमारे ५ कोटी रूपये घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पाटणाचे मुख्य न्यायदंडाधिकारी विजय किशोर सिंग यांनी कोतवाली पोलीस ठाण्याला सहा नेत्यांविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी बिहारमधील कथीत काँग्रेस प्रभारी निरीक्षक तथा काँग्रेस नेते संजीव सिंह यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, राज्यसभा सदस्य मीसा भारती यांच्यासह बिहार काँग्रेसचे अध्यक्ष मदन मोहन झा, सदानंद सिंह, राजेश राठोड यांनाही आरोपी करण्यात आले आहे. भागलपूरमधून लोकसभेचे तिकीट देण्याच्या बदल्यात या ५ लोकांनी १५ जानेवारी २०१९ रोजी पाच कोटी रुपये घेतले, पण लोकसभेचे तिकिट दिले नव्हते.
संजीव सिंह यांनी म्हटले आहे की, लोकसभा इतकेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीटाचे आश्वासन देण्यात आले होते पण तेही मिळाले नाही, असा आरोप आहे. संजीव सिंह या प्रकरणी तेजस्वी यांच्याशी संपर्क साधला असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पाटणा मुख्य न्यायदंडाधिकारी विजय किशोर सिंह यांनी या प्रकरणाची दि. ३१ ऑगस्ट रोजी सुनावणी केली. यानंतर, दि.१६ सप्टेंबर रोजी पाटण्यात कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, या घटनेबाबत राजदचे प्रवक्ते चिंतारंजन गगन म्हणाले की, हा आरोप करून पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. न्यायालयीन प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. तर काँग्रेस प्रवक्ते राजेश राठोड यांनी म्हटले आहे की, गुन्हा दाखल करणारे संजीव सिंह हे काँग्रेस पक्षाचे सदस्य नाहीत. या आरोपाला आम्ही न्यायालयात उत्तर देऊ.