नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक पिकाचे उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करुन दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होण्यासाठी रब्बी हंगाम 2022 पीकस्पर्धेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
पिकस्पर्धेबाबत यापुर्वीचा शासन निर्णय अधिक्रमीत करुन सन 2022-2023 पासून पीकस्पर्धेमध्ये आवश्यक ते बदल करुन यंदाच्या रब्बी हंगाम 2022 पासून पिकस्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे. रब्बी हंगाम पीकस्पर्धेसाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस अशा पाच पिकांची निवड केली आहे. या स्पर्धेसाठी पिकाची निवड करतांना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान 1 हजार हेक्टर असावे. तथापि, संबंधित पिकाखालील क्षेत्र 1 हजार हेक्टर पेक्षा कमी असल्यास व स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण ) यांची विहीत मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक असेल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांचे स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली भात पिकासाठी किमान 20 आर व इतर पिकासाठी 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक राहील.
सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र पीकनिहाय 300 रुपये प्रवेश शुल्क राहील. तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान 10 व आदिवासी गटासाठी किमान 5 यापेक्षा कमी प्रवेश अर्ज असल्यास पिकस्पर्धा रद्द करण्यात येऊन प्रवेश शुल्क परत देण्यात येईल. पिकस्पर्धेंचा निकाल तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने निवडण्यात येईल. अशा पद्धतीने पिकस्पर्धा घेण्याचे प्रथम वर्ष असल्याने प्रथम वर्षी फक्त तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय पीकस्पर्धा घेण्यात येईल. राज्य पातळीवरील पिकस्पर्धा यावर्षी होणार नाही. मागील वर्षांच्या तालुकास्तरीय स्पर्धेतील पिकनिहाय पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्या शेतकऱ्यांनी जिल्हास्तरीय पिकस्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा.
या पीकस्पर्धेसाठी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकापातळीवर पहिले 5 हजार, दुसरे 3 हजार तर तिसरे 2 हजार रुपयांचे बक्षिस राहील. तर जिल्हा पातळीवर पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार तर तिसरे बक्षिस 5 हजार रुपये असेल. तसेच राज्य पातळीवर पहिले 50 हजार, दुसरे 40 हजार तर तिसरे 30 हजार रुपये बक्षिस राहील. रब्बी हंगामातील पिकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर, 2022 आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.
Farmer Rabi Competition 50 Thousand Award