पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या नियमित बदल्या होतात काही वेळा आंतरजिल्हा तर काही वेळा जिल्ह्याच्या बाहेर देखील शिक्षकांच्या बदल्या होत असतात. परंतु यापुढे आता जिल्हा बाहेर शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत. कारण जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांची आंतर जिल्हा बदली बंद होणार आहे. नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही. शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली संपूर्णत: बंद करण्याची तरतूद ग्रामविकास विभागाने त्यांच्या बदली धोरणामध्ये करावी, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच नव्याने नियुक्ती झाल्यानंतर सदर शिक्षकांस जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही.
सुधारीत अटी लागू…
राज्यात शासनाने विहीत केलेल्या कार्यपद्धतीनुसार शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषदांतर्गत रिक्त पदांची संख्या सुनिश्चित करताना तसेच भरतीनंतर शिक्षकांना द्यावयाच्या नियुक्त्यांसाठी सुधारीत अटी लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली संपूर्णत: बंद करण्याची तरतूद ग्रामविकास विभागाने त्यांच्या बदली धोरणामध्ये करावी, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तर नव्याने नियुक्ती झाल्यानंतर सदर शिक्षकांस जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही. तसेच नव्याने नियुक्तीनंतर इतर जिल्ह्यांत जाऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांने रितसर राजीनामा देऊन पुन्हा विहीत प्रक्रियेच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा देऊन त्यातील गुणवत्तेच्या आधारे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक म्हणून नियुक्ती मिळविणे आवश्यक राहणार आहे.
समुपदेशनाद्वारे नियुक्ती
आंतरजिल्हा बदली संपूर्णत: बंद करण्याची तरतूद ग्रामविकास विभागाने त्यांच्या बदली धोरणामध्ये करावी, असे शासन निर्णयात म्हटले आहे. तर जिल्हाअंतर्गत बदलीसाठी शिक्षक पूर्वीपासून कार्यरत असल्यास त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची मागील वर्षीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. तसेच, सदर बदल्यांमध्ये विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेऊन पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही ग्रामविकास विभागाने करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पती पत्नी एकत्रिकरणांतर्गत आदी अपवादात्मक प्रकरणी करावयाच्या बदली संदर्भात देखील ग्रामविकास विभागाने धोरण ठरवावे, असे या संदर्भातील शासन निर्णयात म्हटले आहे.