नवी दिल्ली – आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या विरोधात काँग्रेसने हक्कभंग प्रस्ताव आणला आहे. काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार वेणुगोपाल राव यांनी डॉ. पवार यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटिस दिली आहे. देशातील कोरोना मृत्यूंच्या आकडेवारीबाबत ही नोटिस बजावण्यात आली आहे. कोरोना मृत्यूंच्या आकडेवारीत मोठी तफावत आहे. सरकार आकडे लपवत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा हा ५० लाखांपेक्षा अधिक असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. केंद्र सरकार मात्र मृत्यूचे आकडे लपवून राजकारण करीत आहे, असे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. डॉ. पवार यांनी चुकीची माहिती देऊन सभागृहाची आणि देशाची दिशाभूल केली असल्याचे नोटिशीत म्हटले आहे. ऑक्सिजन अभावी देशभरात शेकडो जणांचा बळी गेला असला तरी डॉ. पवार यांनी जे निवेदन केले त्यात म्हटले आहे की देशात एकही मृत्यू ऑक्सिजन अभावी झालेला नाही. ही बाब अतिशय गंभीर आहे. मंत्री या सभागृहाची दिशाभूल कशी करु शकतात, असा प्रश्नही वेणुगोपाल यांनी विचारला आहे.