नाशिक : रिक्षाप्रवासात महिलेच्या पर्स मधील पाकिट सहप्रवासी असलेल्या भामट्या महिलांनी हातोहात लांबविल्याची घटना द्वारका ते खडकाळी दरम्यान घडली. प्रवासी महिलेच्या पाकिटात ५० हजाराची रोकड होती. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती पंढरीनाथ गांगुर्डे (रा.बनकर चौक,काठेगल्ली) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गांगुर्डे या सोमवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास शालिमार येथे येत असतांना ही घटना घडली. द्वारका येथील कराड फरसाण येथून त्या दोन महिला प्रवाशी असलेल्या एका रिक्षात बसल्या होत्या. द्वारका ते खडकाळी दरम्यान भामट्या महिलांनी गांगुर्डे यांचे लक्ष नसल्याची संधी साधत त्यांच्या पर्स मधील पाकिट चोरून नेले. पाकिटात ५० हजाराची रोकड होती. अधिक तपास हवालदार सोनार करीत आहेत.