मुंबई – भारतीय क्रिकेट संघाच्या कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांचा कर्णधार विरोट कोहली याच्या शतकांचा दुष्काळ कायम आहे. गेल्या दोन वर्षांपासून विराटने एकही शतक झळकावले नाही. रन मशीन म्हणून ओळखला जाणारा विराट मोठा डाव खेळू शकत नाहीये. २००८ मध्ये करिअरची सुरुवात करणार्या विराटचे २०२० हे असे वर्ष होते, ज्यात त्याने एकही शतक केलेले नाही. आता २०२१ जवळपास संपत आलेले आहे. या वर्षीसुद्धा विराटने एकही शतक झळकावले नाही. जर कोहली दक्षिण अफ्रिकेच्या दौर्यात शतक करू शकला नाही, तर या वर्षी त्याच्या शतकांची झोळी रिकामीच राहील. शतक न करू शकणारे त्याचे हे सलग दुसरे वर्ष ठरू शकते.
नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेश विरुद्ध शतक केल्यानंतर विराटने तिनही फॉरमॅटमध्ये एकूण ५१ सामने खेळले असून, त्यात त्याने ३९.७० च्या सरासरीने २०२५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या सर्वाधिक नाबाद ९४ धावा होत्या. या धावा त्याने टी-ट्वेंटी सामन्यात केल्या आहेत. कसोटीत विराटची परिस्थिती आणखी विदारक आहे. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वाधिक धावसंख्या ७४ होती. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात त्याला शतक झळकावण्याची संधी होती. परंतु पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला आणि दुसर्या डावात ३६ धावा काढून तंबूत परतला.
कसोटीत २६ ची सरासरी
विराटने बांगलादेश विरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामन्यात शतक केल्यानंतर १३ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात २६.०४ च्या सरासरीने ५९९ धावा बनविल्या आहेत. त्याची ७४ ही सर्वाधिक धावसंख्या होती. विराटचे संपूर्ण कसोटी करिअरवर नजर टाकली तर ९७ सामन्यात विराटने ५०.६५ च्या सरासरीने ७८०१ धावा केल्या आहेत. गेल्या दोन वर्षात त्याची सरासरी निम्म्यावर घटली. ८४ सामन्यात २७ शतक करणारा विराट गेल्या १३ सामन्यात एकही शतक करू शकला नाही. स्वतःवरील दबाव कमी करण्यासाठी विराटला मोठा डाव खेळावा लागणार आहे. नाही तर टी-ट्वेंटीनंतर एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटचे कर्णधारपद सोडावे लागू शकते.
एकदिवसीय सामन्यातही निराशाच
२५४ एकदिवसीय सामन्यांत ४३ शतक झळकावणारा विराट गेल्या दोन वर्षात एकदिवसीय सामन्यात एकही शतक झळकावू शकला नाही. त्याने ऑगस्ट २०१९ मध्ये वेस्टइंडिजविरुद्ध शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतर विराट दोनदा ८९ धावांवर बाद झाला आहे. एकदिवसीय सामन्यात त्याचा खूपच वाईट खेळ होता असे नाही. परंतु मोठा डाव खेळून स्वतःच्या जोरावर एकही सामन्यात विजय मिळवू शकला नाही. गेल्या दोन वर्षांत त्याने १५ सामन्यात ४३.२६ च्या सरासरीने ६४९ धावा केल्या आहेत.
टी-२० मध्ये शतक नाहीच
विराट कोहली याने एकदिवसीय आणि कसोटी सामने मिळून ७० शतके झळकावली असली तरी टी-२० सामन्यात एकही शतक झळकावू शकला नाही. गेल्या दोन सामन्यात तो चांगला खेळला आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने वैयक्तिक मोठी संख्या याच सामन्यात उभारली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये त्याने वेस्टइंडिज विरोधात नाबाद ९४ धावा केल्या होत्या. शेवटच्या शतकानंतर त्याने ५९.७६ धावांच्या सरासरीने ७७७ धावा केल्या आहेत. त्याच्या टी-२० सामन्यांमधील सरासरी ५२.०४ इतकी आहे.