नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनाचे संकट पुन्हा घोंघावू लागले आहे. चीनसह काही देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याची दखल घेत भारत सरकारनेही विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. विमानतळावर प्रवाशांची कोरोना चाचणी हा त्याचाच एक भाग आहे. तसेच, गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत नियोजित किंवा संभाव्य पर्यटन सहलीला जावे किंवा नाही, असा प्रश्न पर्यटकांना पडला आहे. आता यासंदर्भात ट्रॅव्हल एजंटस असोसिएश ऑफ नाशिक (तान)ने महत्त्वाची माहिती दिली आहे.
ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिकने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, चीनमध्ये कोविड वाढत आहे, अशा बातम्या पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर आम्ही पर्यटकांना आवाहन करीत आहोत की, भारतामधील बहुतांश लोकांचे कोविड लसीकरण झालेले आहे. भारतीय लस ही अतिशय प्रभावी असल्याचे सिद्ध होत आहे. भारतीय नागरिकांची कोविड प्रतिकारक्षमता ही चांगली आहे आणि आधी आलेला कोविड लाटेसारखा प्रकार आता संभव नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र सोशल मीडिया आणि इतर काही ठिकाणी विनाकारण कोविडचा बागुलबुवा उभा केला जात असल्याचे तानने म्हटले आहे.
संस्थेने पुढे म्हटले आहे की, सर्व पर्यटकांना ट्रॅव्हल एजंट असोसिएशन आवाहन करत आहे की, कृपया फक्त सरकारने जारी केलेल्या परिपत्रकांकडेच लक्ष द्यावे. सरकारने अधिकृतरित्या जारी केलेले आरोग्य विषयक नियमच पाळावेत. विविध सोशल मीडियावर फिरणाऱ्या अतिरंजित व खोट्या अफवांना बळी पडू नये. आणि घाबरू नका तसेच आपण येत्या पर्यटन हंगामासाठी देशांतर्गत अथवा आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे बुकिंग केलेले आहे ते जैसे थे ठेवा. मोकळ्या मनाने पर्यटनाचा आनंद घ्यावा. या उपर सरकारने काही नवीन सूचना जारी केल्या तर ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिक तर्फे त्या आपणापर्यंत तातडीने पोहचवण्याची व्यवस्था केली जाईल. पर्यटकांच्या सोयीसाठी जानेवारीमध्ये बहुप्रतिक्षित तानचा एक्सपो देखील आयोजन करण्यात येत आहे. त्याबाबतची माहितीही लवकरच आपणापर्यंत पोहोचवण्यात येईल. सर्वांनी काळजी घ्यावी. सुरक्षित राहावे. धन्यवाद
Covid Threat Tourism Travel Agent Association Appeal