मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही वर्षात बँकिंग घोटाळे आणि फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मार्च २०२२ला संपलेल्या आर्थिक वर्षात बँक घोटाळ्यांच्या ७ हजार ९४० घटना समोर आल्या आहेत. यामुळे सरकारी बँकांचा विविध घोटाळ्यांमध्ये अडकलेला पैसा ५१ टक्क्यांनी कमी झाला असून ही ४०,२९५.२५ कोटी रुपयांवर आला असल्याची माहिती भारतातील बँकांची शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने समोर आणली आहे.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार बँकसंदर्भातील आर्थिक घोटाळे ही चिंतेची बाब आहे. घोटाळे व फसवणुकीवर आळा घालण्यासाठी कठोर नियम लावण्यात आले असले तरी प्रत्यक्षात त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे समोर येत आहे. या घोटाळ्यांमधून केवळ बँकांचेच नाही तर सर्वसामान्यांचेदेखील नुकसान होत आहे. काही महिन्यांपूर्वीच या घोटाळ्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर दिल्ली, तेलंगणा, गुजरात, तमिळनाडूमध्ये सर्वाधिक बँक घोटाळे झाल्याचेही आरबीआयने म्हणले आहे.
बँकांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०२० – २१मध्ये ९ हजार ९३३ घटना समोर आल्या होत्या. त्यामध्ये १२ बँकांचे ८१, ९२१.५४ कोटी रुपये विविध घोटाळ्यांमध्ये अडकले होते. २०२१ – २२मध्ये घोटाळ्यांच्या ७ हजार ९४० घटना उघडकीस आल्या आहेत. त्यातील ९,५२८.९५ कोटी रुपये पंजाब नॅशनल बँकेचे आहेत. या बँकेत ४३१ घोटाळे झाल्याचे समोर आले. तर एसबीआयमध्ये ४ हजार १९२ घोटाळे झाले आहेत.
इंडियन बँकमध्ये २११ घोटाळे झाले असून २०३८.२८ कोटी, इंडियन ओव्हरसीज बँकेतील ३१२ घोटाळ्यात १७३३.८० कोटी, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ७२ घोटाळ्यांमध्ये ११३९.३६ कोटी रुपये अडकले असून सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे ७७३.३७ कोटी रुपये घोटाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे. बँक ऑफ बडोदामध्ये २८० घोटाळ्यात ३९३९ कोटी रुपये तर युनियन बँकेत ६२७ घोटाळ्यात ३९३९ कोटी अडकले आहेत.