मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पाठोपाठ आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे कारण सहकारी संस्था निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्यातील अनेक सहकारी सोसायट्यांसह बँका, साखर कारखान्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांवर स्थगिती आणण्यात आली होती. दि. ३० सप्टेंबरपर्यत निवडणुका घेऊ नये, असा स्थगिती आदेशही सरकारच्यावतीने जारी करण्यात आला होता. आज राज्य सरकारने तो स्थगिती आदेश मागे घेत असल्याचे पत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केले असून खंडपीठानेही त्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे अखेर आता राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग खुला झाला आहे.
महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थाच्या निवडणूक संदर्भात राज्य सरकारच्या वतीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, यापुर्वी राज्यातील सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागांच्या मुख्य सचिवांनी दि. २२ जुलै रोजी एक पत्र जारी केले होते. या पत्रानुसार सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया आहे, तशी ठेवण्याचे निर्देश दिले होते. हे निर्देश आता अखेर मागे घेण्यात आलेत. त्यामुळे आता राज्यात लवकरच सहकारी निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहेत.
यंदा डिसेंबर २०२२ अखेर अनेक तालुक्यातील खरेदी विक्री संघ, बाजार समिती, मर्चंट बँकेसह काही पतसंस्थांची निवडणूक मुदत संपणार आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच विविध सेवा सहकारी संस्थांची निवडणूक मुदत संपणार आहे. त्यामुळे आगामी काळात तालुक्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. कदाचित पाच टप्प्यात या निवडणुका घेण्यात येणार आहेत. जिल्हा निवडणूक आराखड्यातील प्रथम टप्प्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया लवकरच सुधारित निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे सुरू करण्यात येणार आहे.
राज्यात विविध प्रकारच्या २ लाख ५८ हजार ७८६ सहकारी संस्था आहेत. त्यापैकी सुमारे ६७ हजार संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड ते दोन वर्षांत निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. यंदा एप्रिल महिन्यात या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. राज्य सरकारने यापूर्वी सहकारी संस्थांच्या निवडणुका सहा वेळा पुढे ढकलल्या होत्या. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीचा धुराळा उडणार आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. २५० पेक्षा जास्त सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांसह सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, कर्मचारी पतसंस्था अशा विविध संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू होणार आहे. सध्या राज्यातील सहकार क्षेत्रावर काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे वर्चस्व आहे. सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, बाजार समिती, सहकारी वीज मंडळ, पतसंस्था, दूध सोसायटी, खेड्यापाड्यातील विकास सहकारी सोसायटी, आदी संस्थांवर गेली अनेक वर्ष या दोन्ही काँग्रेसचे वर्चस्व आहे. आता शिवसेना, शिवसेनेचा शिंदे गट, भाजप आणि मनसे हे पक्ष देखील सहकारी संस्था आपल्या ताब्यात याव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिसून येते.
Cooperative Societies Institutes Elections