इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यानंतर काँग्रेसला नवीन उभारी देणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या एका विधानाने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. सध्या छत्तीसगडमधील रायपूर येथे काँग्रेसचे ८५वे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान सोनिया गांधी यांच्या वक्तव्याने त्या राजकरणातून संन्यास घेणार की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
‘आम्ही देशाच्या प्रश्नांसाठी लढतो. आता आपण जनतेचा आवाज बनण्याची वेळ आली आहे. धर्म, जात, भाषेची पर्वा न करता आपल्या सर्वांचा आवाज बना. त्यामुळे आमचा विजय निश्चित होईल. राहुल यांच्या समर्पण आणि निष्ठेमुळे भारत जोडो यात्रा यशस्वी झाली. त्याच्या यशाचे श्रेयही यात्रेत सहभागी असलेल्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना जाते.सोनिया गांधी यांनीही आपल्या भाषणात भाजपवर निशाणा साधला. ‘दलित, अल्पसंख्याक, आदिवासी आणि महिलांवर अत्याचार होत आहेत. प्रत्येक संस्थेचा गैरवापर होत आहे. संविधानाच्या मूल्यांना धक्का पोहोचला आहे. पुढे आणखी कठीण काळ आहेत, असंही सोनिया गांधी म्हणाल्या.
‘सेवा, संघर्ष, बलिदान, सर्वप्रथम हिंदुस्थान’ काँग्रेसचा नवा नारा
भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सर्व संस्था ताब्यात घेतल्या असून विरोधकांचा आवाज दाबण्याबरोबरच द्वेषाची आग पेटवली जात असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तिरंगा फडकवून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली आणि ‘सेवा, संघर्ष, बलिदान, सर्वप्रथम हिंदुस्थान’ असा नारा दिला.
खरगेंचा केंद्रावर हल्लाबोल
खरगे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल करत आज केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने निवडून आलेली सरकारे पाडली जात असल्याचे सांगितले. काँग्रेसचे अधिवेशन रोखण्याचाही प्रयत्न करण्यात आला, मात्र छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. असे लढायला आणि स्पर्धा करायला शिकले पाहिजे, रडून चालणार नाही, असा सल्लाही काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला.
Congress Sonia Gandhi Indication Politics