इंडिया दर्पण विशेष – वृक्षवल्ली आम्हां सोयरी
रस्त्यातील वृक्षांचे करायचे काय?
केवळ नाशिकच नाही तर अनेक शहरांमध्ये रस्त्यांचे रुंदीकरण केले जात आहे. यामुळे यात येणाऱ्या वृक्षांना धोकादायक संबोधले जाते. अपघात होण्याच्या भीतीने ही झाडे सर्रास तोडण्याची मागणी केली जाते. हा प्रश्न नेमका काय आहे, ही झाडे खरोखरच धोकादायक आहेत का याचा विचार करण्याची गरज आहे.
धोकेदायक वृक्ष की धोकेदायक आपली मानसिकता? मनुष्य प्राणी हा खूप शिकला असे जेव्हा त्याला वाटायला लागलं आहे, तेव्हा त्याला आपल्या अवतीभवती सहजासहजी या चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत. तो त्याला धोकादायक किंवा त्रासदायक संबोधू लागलाय. हो नक्कीच. लोकसंख्या वाढीमुळे प्रत्येक शहराची काही गरज वाढली आहे. त्यात काही रस्त्यांचे रुंदीकरण हे अपेक्षित आणि गरजेचे आहे. काही ठिकाणी अपवादात्मक काही वृक्ष शंभर-दीडशे वर्षापूर्वीची आहेत. काही रस्त्याच्या मध्यभागी, साईड मार्जिन मध्ये रस्त्यामध्ये आलेले आहेत. काही ठिकाणी आपण वृक्षांना कल्पकतेने वाचवू शकतो. काही ठिकाणचे वृक्ष नक्कीच काढण्याची गरज आहे व ती काढली सुद्धा पाहिजे. अपघात होतात, ज्या घरातला माणुस जातो त्यांना खुप काही सहन कराव लागते, हे ही तितकेच खरे. पण काही गोष्टींचा आपण सखोल विचार (किंवा आत्मपरीक्षण) करणे आवश्यक आहे.
मित्रांनो, शहरातले रस्ते म्हणजे काही हायवे नाही. कुठलीही वाहतूक कोंडी न होता नागरिकांना सुरळीत त्या रस्त्यावरून मर्यादित वेगामध्ये वाहन चालवून जाणे यासाठी शहरातील रस्ता रुंदीकरण अपेक्षित आहे. शहरातल्या रस्त्यांवर बऱ्याच ठिकाणी रोज अपघात होतात. काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. हे सर्व अपघात केवळ झाडामुळेच होतात असा जर चंग काही जणांनी बांधला आहे. त्यांनी कृपया आत्मपरीक्षण करावे.
अपघात हे सिग्नलवरही होतात. गाड्यांच्या अति वेगामुळे डिव्हायडर तोडून धडका देऊन उलटलेली वाहन आपण बघतच असतो. अशा वेळेस आपण सिग्नल किंवा डिव्हायडर काढून टाकायचा विचार करतो का. मात्र, शंभर-दीडशे वर्षाची झाडे सरसकट तोडण्याचा आपण विचार करतो किंवा बोलून दाखवितो. अशा ठिकाणी झाडांच्या अलिकडे रिफ्लेक्टर लावले, फलक लावले, रम्बलर स्ट्रीप लावले तर निश्चितच फरक पडेल.
वृक्षतोड होऊन रस्ता रुंदीकरण झालेल्या रस्त्यांची आज काय परिस्थिती आहे. अत्यंत वाईट आहे. झाडे गेली पण अपघात थांबलेले नाहीत. त्यामुळे ही जबाबदारी घ्यावी की यापुढे झाड तोडल्यावर त्या रस्त्यावर अपघात होणार नाही. रस्त्यातील झाडांबद्दल बोलले जाते पण अतिक्रमणाबद्दल काहीच वाच्यता होत नाही असे का. त्यामुळेही रस्ता वाहतुकीस कमी उपलब्ध होतो. झाडांना बोलता येत नाही त्यामुळे त्यांच्यावर सर्रास घाव घातला जातो. अतिक्रमण, रस्त्यातील अवैध वाहतूक विक्रेते यांचे काय.
नाशिकचेच उदाहरण घ्या, सीबीएस ते मेहेर सिग्नल येथील बुचाची झाडे तोडली गेली. आज याच ठिकाणी अनधिकृत पार्किंग व्यवस्था झाली आहे. जेल रोड पाण्याची टाकी पासून ते बिटको पॉइंट पर्यंत जी काही झाडे तोडली गेली, आज या ठिकाणी दोन ओळींमध्ये भाजी बाजार बसतोय. अशीच परिस्थिती म्हसरूळ ते आकाश पेट्रोल पंप सिग्नल पर्यंत, पंचवटी पोलीस स्टेशन ते दिंडोरी नाक्यापर्यंत, इंदिरा नगर येथील काही भागात, गंगापूर रोड वरील जेहान सर्कल ते पाईप लाईन रोड सिग्नल, मुख्य म्हणजे बी डी कामगार चौक ते तारवाला नगर अशा सर्वच ठिकाणी आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच या प्रश्नाचा गांभिर्याने विचार करायला हवा….