इंडिया दर्पण विशेष – वृक्षवल्ली आम्हां सोयरी
बगीच्या मध्ये कुंड्या कुठल्या वापराव्यात
अनेक जण नेहमी भेटतात. वृक्षारोपणाविषयी चर्चा करतात आणि शंकाही विचारतात. त्यात एक प्रमुख बाब असते ती म्हणजे बगीच्यातील कुंड्या. या कुंड्या कशा आणि कोणत्या वापराव्यात असे प्रश्न विचारला जातो. आज त्याविषयीच जाणून घेऊया…
घरगुती बगीच्या करताना पर्यावरणच्या दृष्टीने कुंड्या कोणत्या वापराव्यात यावरुन अनेकांची द्विधा मनस्थिती होते. त्यामुळेच मातीच्या कुंडींच्या शोधात फिरत असतात. ज्या पुर्वी बाजारात सगळीकडे सहजासहजी उपलब्ध असायच्या. या बाबत कारण विचारल्यावर ते सांगतात की, प्लास्टिक हे पर्यावरणास हानिकारक आहे. म्हणून आम्हाला ते वापरायचं नाही. आम्ही मातीच्या कुंड्या वापरून बगीचा करणार आहोत. त्यांच्या विचारांची ही एक बाजू झाली. याबाबतीत जेव्हा आपण दुसऱ्या बाजूने विचार करतो तेव्हा लक्षात येतं की कुंड्यांसाठी जे प्लास्टिक वापरल जातं, त्याचा पुनर्वापर होतो.
मातीच्या कुंड्या बनवल्या जातात, त्यामुळे ज्या भागात मातीचे खोदकाम होतं तिथे निसर्गाची हानी ही खूप मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे दोन्हीकडच्या बाजू व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात. त्यातल्या त्यात कुंड्यांच्या बाबतीत पर्यावरणाला कमी घातक अशी गोष्ट जी असेल तिचा वापर करणं हे योग्य आहे. म्हणजेच प्लास्टिकच्या कुंड्या वापरणं हे काही गैर नाही.
काही ठिकाणी सिमेंटच्या कुंड्या वापरतात. मुख्य म्हणजे सिमेंटच्या कुंड्यांचे स्वतःचे वजन जास्त असते. त्याच्यामध्ये माती पण कमी बसते. सर्व बाजूने विचार करता प्लास्टिकच्या कुंड्या या हमखास वापराव्यात. मातीच्या कुंड्या घ्यायच्या आणि परत काही गैर समजामुळे त्यात लाल मातीचा वापर करायचा. म्हणजे लाल माती नर्सरी मधून विकत आणून त्याच्याने कुंड्या भरायच्या. त्याच्यामध्ये आपण जी लाल माती भरतो ती येते कुठून. हा जर विचार केला आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपण जाऊन बघितलं, तर आपण निसर्गाची किती मोठी हानी करतो हे सुद्धा लक्षात येते. तसेच, याद्वारेच आपण आपल्या घरामध्ये शोभिवंत झाडे लावतोय या जाणिवेने खुप वेदना होतील.
खरं तर आपल्या अवतीभवती माती असते ती योग्यच आहे. कुंडी भरतांना १००% माती न भरता ४० % माती व बाकी त्यात पालापाचोळा, कंपोस्ट खत, शेण खत, कोकोपिट व इतर घालून रोप लावाव. त्यामुळे त्यात ओलावा जास्त वेळ टिकून राहतो. आणि रोपांची चांगल्या प्रकारे वाढ होते. माती कमी वापरल्यामुळे कुंडीचे वजन हलकं होतं. या सर्व गोष्टींचा विचार करून आपण आपल्या घरातला बगीच्या सजवण्याचा प्रयत्न करावा. याद्वारे आपण नक्कीच पर्यावरणाचं जतन करून पर्यावरणाला हातभार लावण्याच काम करतोय असंच समजावं.