इंडिया दर्पण विशेष – वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे
देशी व विदेशी वृक्ष
वृक्षारोपणाशी संबंधित अत्यंत लहान बाबींपासून आपण माहिती देणारी ही लेखमाला सुरू केली. आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस ही माहिती अनेकांपर्यंत पोहचते आहे. त्यामुळेच सातत्याने फोन, मेसेज येत असतात. काही लोकं असे म्हणतात की, झाड असतं ते देशी असो की विदेशी असो. कुठलंही लावा. म्हणूनच हे सांगण्याची गरज येते की, देशी वृक्ष आणि विदेशी वृक्ष लागवडीमुळे नेमकं काय होते ते. आजच्या लेखात आज आपण त्याविषयीच सविस्तरपणे जाणून घेणार आहोत….
देशी वृक्षांचे महत्त्व पटवून घेणे गरजेचे आहे. देशी व प्रदेशनिष्ठ वृक्ष,आपल्या वातावरणाची पर्यावरणीय परिसंस्थेची साखळी अबाधित राहण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. तसेच आपल्या वातावरणानुसार जे काही महत्त्व आहे, त्याचा विचार होणे गरजेचे आहे. प्रदेशनिष्ठ वृक्ष लागवडीमुळे तेथील वातावरणाच्या अनुषंगाने त्याच्यावर अवलंबून असलेले मधमाशा, फुलपाखरे, पक्षी, मित्र कीटक, इतर काही घटक जसे उपयुक्त बुरशी , बॅक्टेरिया यांच्यासाठी अन्न, निवाराचे पोषक वातावरण तयार होते. तसेच त्यांच्या मुळांमुळे त्याठिकाणच्या जमिनीचा पोत वाढविण्यासाठी गांडूळ, बॅक्टेरिया, इतर उपयुक्त घटक आणि त्यामुळे तेथे पाण्याचा निचरा चांगला होतो. शिवाय जमिनीचा पाण्याचा स्तर वाढण्यासाठी मदत होते.
देशी झाडांना आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खुपच आयुर्वेदिक महत्त्व आहे. देशी वृक्ष,आपल्या पारंपरिक रानमेव्याचा एक मोठा स्रोत आहेत. देशी वृक्षांचे जो काही पालापाचोळा जमिनीवर पडतो, त्याचे विघटन लवकर होते. तेथील जमिनीचा पोषक स्तर वाढण्यास मदत होते. देशी वृक्ष हे शेती उपयुक्त, शोभिवंत, पर्यावरणाचे घटक अबाधित राखण्यासाठी, आयुर्वेदिकदृष्ट्या महत्वाचे असे सर्व गुणधर्म असलेले आहेत. त्यामुळे त्यांचे वृक्षारोपण करताना महत्व समजून घ्यायला हवे.
विदेशी वृक्ष:-
गुलमोहर, रेनट्री, आकेशिया, ग्लिरीसीडीया, सुबाबुळ, स्पेतोडीया, पेलट्राफोरम, खाया, कायझेलीया पिनाटा, निलगीरी, ट्याबोबीय, व इतर असे ९०% विदेशी वृक्ष हे जगभरातील विविध अतिउष्ण भागातून आलेले आहेत. त्यामुळे इथल्या पोषक जमिनीमध्ये ते पटकन वाढतात. जेवढे पटकन वाढतात, तेवढेच ते ठिसूळ सुद्धा आहेत. आपल्या वातावरणातील पर्यावरणीय परिसंस्थेची साखळी अबाधित राखण्यास असक्षम आहेत. मधमाशी, फुलपाखरू, पक्षी, मित्र कीटक व इतर उपयुक्त घटक, यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण करत नाहीत.
विदेशी वृक्षांची मुळे सुद्धा येथील जमिनीच्या पोताला हानी पोहचवतात. जमिनीतील पाण्याची पातळी घटवतात. त्यांच्यावर वाढणारे कीटक, आपल्या वनसंपदेसाठी व शेतीसाठी घातक परीस्थिती निर्माण करतात. त्यांची पाने जमिनीवर पडतात, तेव्हा ते लवकर विघटन होत नाही. पाने, फुले, फळ जमिनीवर पडल्यावर तेथील जमिनीचा पोत बिघडवण्याचे काम करते. जमिनीत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या प्रक्रियेला बाधा पोहचते. त्यामुळे तेथील पाण्याचा स्तरही बिघडतो.
जसे भूक लागली म्हणून आपण नेहमीच काही पण खाऊन पोट भरल्यास, पोट नक्कीच बिघडणार. तसेच हे आहे. पोषक खाल्यास आरोग्य छान राहणार. पटकन हिरवळ दिसण्यासाठी विदेशी वृक्ष लागवड केल्यास, तेथील वातावरण बिघडणार. असे आहेत परिणाम व दुष्परिणाम देशी व विदेशी वृक्ष लागवडीचे. आपल्याला सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला आहे. तर मग ठरवा आपल्याला कुठल्या प्रकारचे वृक्षरोपण करायचे आहे. तसेच, वृक्षारोपणाशी संबंधित आपल्या काही शंका असतील तर आपण केव्हाही मला संपर्क करु शकता. धन्यवाद.