इंडिया दर्पण विशेष लेखमाला
व्हिजन नाशिक – भाग २
नाशिक : “वेलनेस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड”
नाशिक शहरासह जिल्ह्यात विविध प्रकारच्या क्षमता आहेत. त्यातीलच एक म्हणजे वेलनेस. याच वेलनेसच्या क्षेत्रामध्ये नाशिक हे येत्या काळात केवळ भारतच नाही तर जगाची राजधानी होऊ शकते. ते कसे आणि तसे होण्यासाठी काय करणे आवश्यक आहे हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया…

ज्येष्ठ उद्योजक व संस्थापक, ईएसडीएस.
Email ID: visionnashik@esds.co.in
WhatsApp: 9011009700
माझा एक श्रीमंत मित्र सध्या व्हेंटिलेटरवर आहे, रोज जिम मध्ये जाऊन व्यायाम करणारा हा पाश्चिमात्य विचारसरणी असलेला नवयुवक मागील १ महिन्यांपासून व्हेंटिलेटर वर झोपून आहे. बँकेत जितके पैसे होते, ते हॉस्पिटलला देऊन संपले. एका महिन्यात अशी परिस्थिती येऊ शकते असा विचार सुद्धा कधी कुणी केला नव्हता. देवकृपेने आमचा हा मित्र सुखरूप घरी परत येईल अशी मनात खात्री आहे, पण आमचे असे कित्येक मित्र मागच्या काही वर्षांमध्ये व्हेंटिलेटरची स्वारी करून आले आहेत. काही परत आले आणि काही निघून गेले. पुनीत राजकुमार आणि सिद्धार्थ शुक्ल सारखे कलाकार देखील नियमित जिम करायचे, पण जिमच्या व्यायामाने त्यांच्या हृदयावर विपरीत परिणाम झाला आणि ते जगू शकले नाहीत.
जगाला योग, प्राणायाम आणि ध्यान साधने शिवाय पर्याय राहिलेला नाही. ५ वर्षांपूर्वी आपल्या नाशिकमधील योगगुरू प्रज्ञा पाटील यांनी लागोपाठ १०३ तास योगासन करण्याचा नवीन विश्वविक्रम प्रस्तापित केला, असे कुणी २० तास सुद्धा जिम करण्याचे पराक्रम करू शकते का? तसे केल्यास तो मनुष्य जास्त काळ जगू शकणार नाही. का हा योग विश्वविक्रम नाशिकच्याच महिलेने रचावा? का “आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र धम्मगिरी” ची स्थापना नाशिकच्याच इगतपुरी येथे संत श्री. सत्यनारायणजी गोएंका यांच्या हस्ते व्हावी? का योग विद्याधामची स्थापना त्र्यंबकेश्वरला व्हावी? हा काही योगायोग नाही तर त्याला विशेष कारणे आहेत.
नाशिक मध्ये “आंतरराष्ट्रीय योग विद्यापीठ” व्हायला हवे, या नाशिककरांच्या मागणीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या भेटी दरम्यान सकारात्मक प्रतिसाद दिला होता. सध्या भारतात आणि भारताबाहेर सुद्धा अश्या कुठल्याही प्रकारचे योग विषयी शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम असणारे, प्रचार, प्रसार आणि शिक्षणा साठी वाहिलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे योग विद्यापीठ नाहीय. योग म्हणजे फक्त काही आसनं, प्राणायाम, केवळ श्वासोच्छवासाचे तंत्र नव्हे किंवा आपण रोज सकाळी टी.व्ही. वर जे योगाचे क्लासेस बघतो त्याही पलीकडचे हे एक खूप मोठे शास्त्र आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आपण स्वतःला सुदृढ, सक्षम कसे ठेवू शकतो? या विषयी शास्त्रशुद्ध पद्धतीने योगाचे शिक्षण घेणे फार आवश्यक आहे. नाशिककरांसाठी भूषणावह असलेल्या आणि योग शिक्षणासाठी वाहिलेल्या “योग विद्या धाम” सारख्या संस्था देखील आपल्याकडे आहेत. या व्यतिरिक विविध संस्थांच्या माध्यमातून योग शिक्षण विषयी सर्टिफिकेट्स दिली जातात. काही विद्यापीठांमध्ये योगविषयक पदविका, पदवी, पी.एच.डी. करण्याची सोय देखील आहे. परंतु ह्या सर्व संस्थांना जोडणारे आणि योग विषयी एकसमान अभ्यासक्रम असणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे योग विद्यापीठ नाशिकला होणे ही काळाची गरज आहे. मनुष्याच्या सुखासाठी आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी योग, प्राणायाम आणि ध्यान साधने शिवाय पर्याय नाही.
आपल्या नाशिकचा “वाईन कॅपिटल ऑफ द इंडिया” म्हणून सर्वत्र नावलौकिक आहे, दरवर्षी होणाऱ्या “सुला फेस्ट” सारख्या नावाजलेल्या मोठ्या इव्हेंटमुळे भारतातील आणि जगभरातील हजारो पर्यटक नाशिककडे आकर्षित होतात. नाशिक मधील विविध वायनरी आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट देतात. गेल्या काही वर्षांपासून स्थानिक लोकांच्या आणि इतर काही समस्यांमुळे हा फेस्टिवल नाशिक मध्ये बंद होण्याच्या आणि बेंगळुरू किंवा गोवा मध्ये स्थलांतर होण्याच्या चर्चा सुरु आहेत. हे काही नाशिकसाठी चांगले लक्षण नाही. जागतिक स्तरावर असे फेस्टिवल नियमितपणे होतात, तिथे काही अडचणी होत नाही. आपल्याकडे असे कार्यक्रम नियमित झाले पाहिजेत आणि त्याकरिता येणाऱ्या अडचणी संबंधित यंत्रणेने सामंजस्याने सोडविणे गरजेचे आहे. शासन, प्रशासन आणि नागरिकांनी सुद्धा सकारात्मकतेने पुढाकार घ्यायला हवा. यामुळे पर्यटन, रोजगार निर्मिती, व्यवसाय वृद्धी आणि शहराचे नावलौकिक वाढण्यास हातभार लागत असतो. डिव्हाईन टुरिझम असो किंवा वाईन टुरिझम असो, आपल्याला समतोल ठेवायला हवे. नाशिकला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाने, तो आपल्या गावी परत जाण्यापूर्वी त्याच्या मनात नाशिकसाठी चांगले भाव असणे आवश्यक आहे.
आजमितीस नाशिक मधील काही नामवंत डॉक्टर्स यांच्या हॉस्पिटल्स मध्ये उपचार आणि विविध प्रकारच्या शस्रक्रिया करण्यासाठी जगभरातून रुग्ण येत आहेत. आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे सध्या आजारी पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि उपचारांवरील खर्च सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या नाशिक मधील काही डॉक्टर्स द्वारे कॅन्सर, ब्रेन, हृदय रोग, गुडघेदुखी वरील शस्रक्रिया, इतकेच नव्हे तर डेंटल ट्रान्सप्लांट वर सुद्धा जागतिक दर्जाची आणि वाजवी दरात रुग्णसेवा दिली जात आहे. माझ्या काही मित्रांना आलेल्या अनुभवानुसार परदेशातील हॉस्पिटलच्या तुलनेत, आपल्या नाशिक मध्ये ९०% पर्यंत कमी खर्चांमध्ये रुग्णांवर उपचार होत आहेत.
नाशिक मधील आल्हाददायक वातावरणामुळे रुग्णास आणि त्यांच्या नातेवाईकांना येथे काही दिवस राहावेसे वाटते. त्या निमित्ताने आणि परिसरातील रिसॉर्ट्स, आरोग्यधाम, मंदिरे, गड-किल्ले, डॅम, धबधबे इत्यादी विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटही दिली जाते. नाशिकची वाटचाल आता एका उदयोन्मुख “वेलनेस कॅपिटल” कडे होत आहे. नाशिकच्या जवळपास निसर्गाच्या सान्निध्यात असलेली साधारण ५० पेक्षा जास्त रिसॉर्ट्स आहेत. आपल्या नाशिकचे श्री. किरण चव्हाण वेलनेस आणि इको टुरिजम ह्या क्षेत्रामध्ये चांगले काम करीत आहेत. आपण सर्वानी देखील “वेलनेस कॅपिटल” या संकल्पनेवर गंभीरपणे विचार करून आपल्या नाशिक शहरासाठी “मेडिकल टुरिझम, इको टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी” ह्या क्षेत्रात सकारात्मक योगदान देणे अत्यंत गरजेचे आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक निसर्गरम्य ठिकाणे, पावसाळ्यात तयार होणारे धबधबे आणि साधारण ३६ धरणे आहेत. यातील काही ठिकाणे आणि यांच्या सभोवतालचा परिसर नियोजनबद्ध पद्धतीने विकसित करून नियमित पर्यटन, महसूल आणि अर्थव्यवस्थेस चालना देणे गरजेचे आहे. जगभरात अशी अनेक सुंदर-सुंदर पर्यटन स्थळे आहेत जी धरणाकाठी विकसित केली गेलेली आहेत. शासन, प्रशासन आणि धरण परिसरातील स्थानिक नागरिकांनी सुद्धा याविषयी सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक आहे. आज काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या धोरणात्मक विकासामुळे “टेररीजम (दहशतवाद)” ची जागा “टुरिझम (पर्यटन)” ने घेतली आहे, या वर्षी तर विक्रमी संख्येने पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली, बेरोजगारी संपवण्या करिता हा प्रभावी उपाय आहे.
नाशिक जिल्हा आणि लगतच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात बनलेले रामशेज, ब्रह्मगिरी, अंजनेरी, साल्हेर, मुल्हेर, मांगी-तुंगी, रतनगड, हरिहर गड, त्रिंगलवाडी, भास्करगड, कळसुबाई शिखर, हरिश्चंद्र गड सारखी गिर्यारोहकांना आकर्षित करणारी गड-किल्ले देखील आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये २३ हजार पेक्षा जास्त मंदिरे आहेत, प्रत्येक मंदिरांचे कितीतरी महत्व आहेत. यातील काही मंदिरांचा आणि परिसराचा विकास केला तर “धार्मिक पर्यटनास” मदतच होईल. बाराही महिने मुबलक पाणी, संतुलित हवामान, आल्हाददायक वातावरण, धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळे, यामुळे नाशिक सर्व भाविक, पर्यटक, गिर्यारोहक आणि उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे सुद्धा पसंतीचे ठिकाण बनले आहे.
मित्रांनो, आपण सर्वांनी जर मनापासून प्रयत्न केले तर नाशिकचा समतोल विकास आणि एक नाशिकची नवीन ओळख निर्माण करू शकतो, आपणास या “आंतरराष्ट्रीय योग विद्यापीठ, वेलनेस टुरिझम, इको टुरिझम, मेडिकल टुरिझम, हॉस्पिटॅलिटी, स्पिरिच्युअल टुरिझम, गड-किल्ले, धरणे, धबधबे, ट्रेकिंग टुरिझम” बद्दल काय वाटते ते मला नक्की कळवा. आपल्या शहरात आलेल्या प्रत्येक पर्यटकास आपण यापुढे कशी वागणूक दिली पाहिजे? यावरही आपण नक्कीच सकारात्मक विचार करावा. आपण सर्वानी मिळून ठरवले तर, नाशिकला नक्कीच “वेलनेस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड” या पदवीने सन्मानित करण्यात येईल.
आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत….
श्री पियूष सोमाणी
ज्येष्ठ उद्योजक व संस्थापक, ईएसडीएस.
Email ID: visionnashik@esds.co.in
WhatsApp: 9011009700
Column Vision Nashik Wellness Capital Of the World by Piyush Somani
Tourism Yoga Health