विचार पुष्प
प्रार्थनेचे खरे महत्त्व
आमच्याकडून प्रमाद घडू नयेत म्हणून आम्हांला मार्गदर्शन कर, अशी प्रार्थना आपण करतो ती अगदी मनापासून होते की नाहीं हे कसे जाणावयाचे? नित्य जीवनात पूर्वी घडलेले लहान-मोठे अपराध पुन्हा न घडावे म्हणून आपण दक्ष राहिलो तरच ती प्रार्थना मनापासून होती असे म्हणता येईल. कारण परमेश्वर मार्गदर्शन करतो ते परिणाम भोगावयास लावूनच.
म्हणून एखाद्या अपराधाचे परिणाम एकदा भोगल्यानंतर आपण त्यापासून धडा घेतला पाहिजे. “दुष्ट विचारांचें आम्हावर आक्रमण होऊं देऊ नको”, अशी प्रार्थना करतांना, हृदयांत शिरलेले व तुम्हास दिसलेले दुष्ट विचार काढून टाकण्यासाठी, तसेंच त्यांच्याशी लढण्यासाठीं तुम्हीं तयार असले पाहिजे. कारण दुष्ट विचार तुमच्या दृष्टिपथांत आणण्याचें काम तेवढे परमेश्वर करतो. सत्यासाठी लढा देणारा शूर साधकच अध्यात्ममार्गावर प्रगत असतो.
(संकलित)
Column Vichar Pushpa Importance of Prayer