इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्गयात्री –
ट्री मॅन ऑफ इंडिया : एम. योगनाथन
तामिळनाडू राज्यातील एक सर्वसामान्य बस कंडक्टर मारीमुथु योगनाथन, आपली सीमित पगाराची नोकरी सांभाळून राज्यभर वृक्षारोपणाची मोहीम राबवतात. प्रवाशांना तिकीटासोबत आपल्या स्वखर्चाने एक रोपटं भेट देतात. चला जाणून घेऊया एका सर्वसामान्य बस कंडक्टरचा इको वॉरियर या पर्यावरण क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कारापर्यंतचा प्रवास….
” वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे”या संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे , एखाद्या झाडाचे नाव माहिती असो वा नसो, झाडाचे वय माहिती असो किंवा नसो काही फरक पडत नाही. त्यावर पक्षी येतात,बसतात ,मंजुळ गाणी गातात. झाडं कोणताही भेदभाव न करता सर्वांना सारखाच आसरा देतात,सावली देतात. झाडांचं विश्वच वेगळं आहे. स्वार्थाचा लवलेशही नसणारं.कितीही आभाळापर्यंत पोचलं तरी आपली पाळेमुळे जमिनीत घट्ट रोवून ठेवणारं.अशीच काही माणसं असतात, ज्यांना त्यांच्या कामाचा ठसा पडेल की नाही याची चिंता नसते. कारण ही माणसं झाडासारखी असतात.
निस्वार्थी आणि निरपेक्ष. फक्त सावली द्यायचं काम करतात.काही माणसं गुणवान असतात पण सर्वच झाडं गुणकारी असतात. 1999 मध्ये योगनाथन तमिळनाडू राज्य परिवहन मंडळाच्या सेवेत बस कंडक्टर म्हणून रुजू झाले. परंतु गमतीचा भाग असा की, केवळ कामावर वारंवार गैरहजर राहिल्याने त्यांची 17 वर्षात 40 वेळा बदली झाली. आणि विशेष म्हणजे योगनाथन यांनी या रजा कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी न घेता वृक्षारोपण कार्यक्रमांसाठी किंवा जनजागृतीसाठी घेतल्या होत्या. पण 2008 मध्ये भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याहस्ते एम. योगनाथन यांचा इको वॉरियर ह्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आणि तेव्हापासून कामाच्या ठिकाणी त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला.
मारीमुथु योगनाथन यांचा जन्म तंजावर जिल्ह्यातील मायावरम येथील एका गरीब कुटुंबात झाला. केवळ 7 वर्षाचे असताना त्यांनी वडील गमावले. त्यांची आई चहाच्या बागेत काम करत असे. सुट्टीच्या दिवसात ते आईला भेटायला येत. त्यावेळी कोटागिरी मध्ये तामिळनाडू हरित कार्यकर्ते जयचंद्र यांच्याशी त्यांचा जवळून संबंध आला आणि त्यांच्या सहवासात निसर्ग संवर्धनाची आवड वाढत गेली. योगनाथन म्हणतात,”मला लहानपणापासूनच जंगलं पाहण्याची आवड होती. निसर्गाबद्दल मला कायम उत्सुकता होती. लहानपणी मी हौसेने वनस्पती, जीवजंतूंची माहिती गोळा करायचो.त्यामुळे मी एकांत आवडणारा विद्यार्थी होतो पण त्यामुळेच माझ्या वर्गमित्रांसाठी मात्र मी अतिशय कंटाळवाणा मित्र होतो.”
शालेय विद्यार्थी असताना त्यांनी निलगिरी जिल्ह्यातील लाकूड माफियांविरुद्ध लढा दिला. सार्वजनिक भिंतींवर छुप्या रीतीने निषेध दर्शवणारे हस्तलिखित पोस्टर चिटकवले. ज्या ठिकाणी झाडं तोडली गेली ते त्यांच्या सर्वेक्षण क्रमांक सहा ओळखून इतक्या लहान वयात पोलीस आणि वन अधिकाऱ्यांना गुन्हेगारांवर कारवाई करण्यास मदत केली. त्यानंतर बस कंडक्टरची नोकरी सांभाळून त्यांनी त्यांची निसर्ग संवर्धनाची आवड कायम ठेवली.योगनाथन यांनी गेल्या तीस वर्षात तीन लाखाहून अधिक रोपे लावली .पण नुसतेच रोपं लावून मोकळे झाले नाहीत तर त्यातील 50 टक्के रोपांचे आता झाडांमध्ये रूपांतर झालं आहे.
तमिळनाडूमधील 35 जिल्ह्यांमध्ये जवळ जवळ तीन हजार शाळांना त्यांनी पर्यावरणविषयक जागरुकता करण्याविषयी भेटी दिल्या. 5 जून या जागतिक पर्यावरणदिनी राज्यातल्या सुमारे पाच हजार शाळांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली आणि त्यांच्या कॅम्पसमध्ये प्रत्येकाने किमान ‘एक तरी झाड लावा’ या योगीनाथन यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. योगानाथन एखाद्या मुलाला जेव्हा रोप लावायला सांगतात तेव्हा त्या रोपाला त्या मुलाचंच नाव देतात आणि त्यामुळे त्या रोपाची आपल्याच एखाद्या भावंडाप्रमाणे मुलं काळजी घेतात. अलीकडे ते एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून विविध शाळांमध्ये जाऊन मुलांमध्ये निसर्ग संवर्धनासंबंधी पर्यावरण जागरूकता करतात. सध्या तमिळनाडूमध्ये ‘ट्रि मॅन ऑफ इंडिया’ या नावाने ते प्रसिद्ध आहेत.
‘इको वॉरीयर’ या मानाच्या पुरस्कारासोबतच ,त्यांना वन्यजीव चित्रपट निर्माते माईक पांडे यांच्या हस्ते ‘अनसंग हीरो ‘ या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. एक सर्वसामान्य नागरिक असून त्यांचे असामान्य काम खरोखर कौतुकास्पद आहे. केवळ एका बस कंडक्टरच्या अत्यंत सीमित पगारामध्ये सुद्धा ते पगारातील जवळजवळ 40 टक्के भाग या पर्यावरण रक्षण कार्यासाठी देत असतात.बसमधील प्रत्येक प्रवाशाला तिकीटसोबत एक रोप भेट देतात आणि वृक्षारोपण करण्याची विनंती करतात. त्यांची तळमळ लक्षात घेऊन तामिळनाडू सरकारने त्यांना”सुत्रू सुजल सियाल विरक्क”ही पदवी बहाल केली आहे.
ज्या वेळी भारत सरकारने त्यांना ‘इको वॉरियर’या पुरस्काराची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी,”मला पुरस्कार पोस्टाने पाठवा. कारण माझ्याकडे ट्रेनचे भाडं पैसे नाहीत. माझ्याकडे तेवढ्या रजा नाहीत आणि दिल्लीत राहण्याचा खर्चदेखील मला परवडणार नाही.पण,मला देशाच्या उपराष्ट्रपतींच्याहस्ते ‘इको वॉरीयर’ हा पुरस्कार वैयक्तिकरित्या मिळाला याचा मला आनंद आहे.”असं त्यांनी शासनाला पत्र पाठवलं. मन की बात’ च्या 75 व्या भागात देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील एम.योगनाथन यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.
मग आहे की नाही ही व्यक्ती एखाद्या झाडासारखीच निस्वार्थी आणि निरपेक्ष.आपण काय करू शकतो? लवकरच अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन आपण भारतीय साजरा करणार आहोत. ‘हर घर तिरंगा’ या नाऱ्याप्रमाणेच ‘तिरंग्यासोबतच प्रत्येक घरटी एक झाड लावू या’. यादिवशी आकाशात तिरंगा फडकेल आणि मातीमध्ये एक नवीन आशेचा अंकुर उमलेल तर भविष्यातल्या ग्लोबल वॉर्मिंग सारख्या शत्रूपासून मुक्ती मिळवणे काही कठीण नाही.
Column Nisargayatri Tree Lover Conductor
M Ypganathan Tamilnadu Smita Saindankar