“बहुमतापासुनी वेगळा, होऊनी राहिलो निराळा”
दिलीप व पौर्णिमा कुलकर्णी
तुमच्याआमच्यासारखेच सामान्य पण ज्यांना प्रचलित विचार पद्धती, जीवनपद्धती पटत नाही. त्यातले दोष खुपत राहतात अशी मंडळी धाडसाने मुख्य प्रवाहातून बाहेर पडतात आणि आपल्या वेगळ्या विचारसरणीनुसार जगण्याची हिम्मत दाखवतात. अर्थार्जन, उपभोग आणि संचय यावर मर्यादा घातल्याशिवाय स्वतःचं आणि पर्यावरणाचं भलं होणार नाही त्यासाठी प्रत्येकाने स्वतःवर स्वयंस्फूर्तीने मर्यादा घातल्या पाहिजेत ही विचारसरणी अमलात आणणारे दाम्पत्य म्हणजे श्री. दिलीप आणि सौ. पोर्णिमा कुलकर्णी….
सामान्यतः प्रत्येकजण “अपवर्ड मोबिलिटी”च्या दिशेने भविष्याची स्वप्न पाहत असतो पण या दोघांची स्वप्नं मात्र जगाच्या अगदी उलट दिशेने म्हणजेच “डाउनवर्ड मोबिलिटी”ची होती.
दिलीपजी खरंतर त्याकाळातले अभियांत्रिकी पदविकाप्राप्त आणि पौर्णिमा ताई आयुर्वेदाचार्य. 1985 मध्ये लग्नानंतर संयमित उपभोगाचा विचार हा लोकांना नुसता सांगून उपयोगाचा नाही तो आपल्या जगण्यात उतरवणे हे अधिक महत्त्वाचे आहे असं त्या दोघांना वाटू लागलं आणि त्यांनी ठरवलं , ‘निसर्गस्नेही जीवन शैली’जगायचं . मग त्यासाठी शहर सोडून एखाद्या खेड्यात निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाता येईल अशा ठिकाणी राहायला जायचं.
1997 ला कोकणात कुडावळ्याला मित्राकडून दहा गुंठे जमीन भाडेकराराने घेऊन हे दोघे खेड्यात राहायला आले. केवळ शेती ,गुरं, बागकाम यात न अडकता लेखन, व्याख्यान या माध्यमातून निसर्गस्नेही जीवनशैली चा प्रसार करण्यासाठी ते सरसावले. दरम्यानच्या काळात दिलीपदादांनी हसरे पर्यावरण,दैनंदिन पर्यावरण, अणू विवेक, सम्यक विकास, बसूचरित्र, अहेड टू नेचर, वेगळ्या विकासाचे वाटाडे या पुस्तकांचं लिखाण केलं तसेच गतिमान संतुलन हे प्रबोधन मासिक सुरू केले. त्यानंतर त्यांना निसर्गायण शिबिराची कल्पना सुचली. प्रत्यक्ष ऐकून बघून त्याप्रमाणे ज्यांना आपल्या जीवनशैलीत बदल करायचा आहे अशांसाठी निवासी व अनिवासी शिबिराला सुरुवात झाली.
निसर्गस्नेही जीवनशैली हा विचार स्वतः च्या जगण्यात उतरवणे म्हणजे पर्यावरण जगणे. त्यासाठी या द्वयींच्या मनात एकच विचार असतो तो म्हणजे आपले उपभोग आपला निसर्गावरचा भार कसा कमी करता येईल आणि जीवन शैली जास्तीत जास्त निसर्गस्नेही कशी करता येईल? शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि अध्यात्मिक हे आंतरिक विकासाचे आयाम साध्य करण्यासाठी दिवसभर विविध कृती करत राहणं म्हणजेच पर्यायाने निसर्गस्नेही जीवनशैली घडवणं.
पौर्णिमा ताईंना चौकटीतल्या आयुष्याचं कधीच आकर्षण नव्हतं. किंबहुना कपडे ,दागिने, खरेदी याची त्यांना विशेष नावड. भरपूर पैसे, भरपूर वस्तूंनी भरलेलं मोठं घर, दारात आलिशान गाडी ही त्यांची स्वप्न कधीच नव्हती. त्यामुळे त्यांना खेड्यातल्या छोट्याशा कौलारू घरात निसर्गाच्या सान्निध्यात साधं शांत जीवन जगताना आनंद मिळाला. पौर्णिमाताईंचे वैद्यकीय शिक्षण आयुर्वेदात असल्याने लोकांना उपचारासाठी फक्त आयुर्वेदिक औषध देणं पुरेसं नाही तर आयुर्वेदात सांगितलेली आरोग्यदायी आदर्श जीवनशैली लोकांपर्यंत पोहोचायला हवी हे त्यांच्या लक्षात आलं कारण आयुर्वेदिय जीवनशैली आणि निसर्गस्नेही जीवनशैली या परस्पर पूरक आहेत. लोकांना प्रबोधन करण्याआधी आपल्या कुटुंबामध्ये ती आचरणात आणली तरच लोकांचा त्यावर विश्वास बसेल यासाठी हे कुटुंब खालील बाबी कटाक्षाने पाळतात.
सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे आणि सूर्यास्ताच्या आत घरी परत येणं
दररोज सकाळी सूर्यनमस्कार, योगासन तसेच दिवसाकाठी कमीत कमी एक तास शारीरिक श्रम करणे.
शक्यतो घरचं अन्न खाणं.प्रवासाला निघताना घरून डबा घेऊन जाणे. खाद्यपदार्थ करताना ऋतुमानाप्रमाणे सर्व रानभाज्यांचा त्यात समावेश करणं.
स्थानिक सेंद्रिय फळं, भाजीपाला सेवन करणे.
दोनवेळा नियमित प्रार्थना करणे.
आपली उत्पादनशैली वा उपभोगशैली निसर्गाला संपवून टाकणारी आहे आणि आपण त्याला विकास म्हणतो पण,पर्यावरणरक्षणासाठी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे या उद्देशाने त्यांनी जास्तीत जास्त सायकल वापरणे, सुती कपडे वापरणे ,कपड्यांना इस्त्री न करणे, पाठकोऱ्या कागदावरच लिखाण करणं इत्यादी गोष्टी अंगीकारल्या.या कुटुंबाची चतुसूत्री अशी आहे.
अनावश्यक व हानिकारक वस्तूंचा वापर पूर्णपणे टाळणं.
आवश्यक वस्तूंचाही वापर कमी करणे.
सर्व वस्तूंचा शक्य तितक्यावेळा पुनर्वापर करून त्यांचा पूर्ण वापर करणे.
पूर्ण वापरानंतर त्यांच्यापासून पुनर्घटन म्हणजेच पुन्हा काहीतरी बनेल हे पाहणे. विकासाच्या नावाखाली संपूर्ण जग सातत्याने अधिकाधीक संसाधन वापरत आहे. त्यामुळे या दोघांनी गांधीजींच्या तत्त्वाप्रमाणे केवळ स्थानिक संसाधन म्हणजेच कच्च्या मातीचे ठोकळे, जंगली झाडांपासून मिळालेले वासे, कौलं वापरून कुडावळ्यात स्वतःचं घर बांधलं. संडास मोरी चे दरवाजे पाण्याने खराब होऊ नये म्हणून ॲल्युमिनियम ऑफ साईट छपाईच्या जुन्या प्लेट्सचे दरवाजे बसवण्यात आले. जे गंजत नाहीत.
प्लास्टिकचा वापर टाळण्याचा प्रयत्न हे कटाक्षाने करतात. ही मंडळी प्रवासाला निघताना आपले स्टीलचे पेले सोबत घेऊन जातात की जेणेकरून चहा पिण्यासाठी कागदी पेले वापरायला नको. गरजेपेक्षा जास्त भांडीकुंडी, कपडे, चपला बूट यांचा संग्रह करायचा नाही. सौंदर्यप्रसाधन म्हणजेच साबणाऐवजी उटणे,कपडे धुण्यासाठी डिटर्जेंट ऐवजी पिवळी साबण वडी, भांडी घासण्यासाठी राख, दात घासण्यासाठी त्रिफळाचुर्ण किंवा दंतमंजन इत्यादी जेवढं नैसर्गिक जगता येईल तेवढं ही मंडळी जगत असतात. पाण्याचा,कागदाचा पुनर्वापर तर कटाक्षाने केला जातो. सेलमध्ये निकेल आणि कॅडमियम हे विषारी धातू असतात.संपलेले सेल फेकले की ते धातू जमिनीत किंवा पाण्यात पसरतात. त्यामुळे घड्याळ , टॉर्च यासारखी सेलवर चालणारी उपकरणं ते वापरत नाहीत. याशिवाय ऊर्जा बचतीसाठी खनिज तेलाचा वापर टाळणे, सौर उष्णता आणि लाकडाचा अधिक वापर करणं ,शक्यतो प्रवास पायी, सायकलने किंवा लाल एसटीतून करणे, स्वयंपाक सौर चुलीवर करणे अशा कित्येक दैनंदिन गोष्टी ही दोघे कमीत कमी संसाधनांच्या मदतीने आणि निसर्गाची शान राखून करण्याचा प्रयत्न करतात.
गंमतीची बाब म्हणजे यांना पुस्तकांचं मिळणारं मानधन, व्याख्यानांचे मानधन, प्रकाशनात मिळणारे उत्पन्न, ठेवींवर व्याज या उत्पन्न स्त्रोतातून मिळणारे पैसे खर्च कसे करायचे हा प्रश्न पडतो . खरंय, “न मागे तयाची रमा होय दासी” या उक्तीप्रमाणे जर भोग कमी असतील तर खर्चापेक्षा उत्पन्न नेहमीच जास्त होते आणि पर्यायाने समाधान देखील. मग ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी शिबिरांचे मानधन, प्रवासखर्च घ्यायचा नाही .पुस्तकांच्या किमती कमीत कमी ठेवून नफा नाममात्र असावा असं ठरवलं. यांची मुलं अमेय आणि सृजन यांच्यावरही आई-बाबांच्या विचारांचा पगडा आहे. त्यांना देखील कॉम्प्युटर गेम्स, हॉटेलिंग, खरेदी वगैरेची कधीच ओढ वाटली नाही. उलट आई बाबांच्या या चाकोरीबाहेरच्या निर्णयाचा त्यांना फायदा झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
खरंतर, प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की असे एका कुटुंबाने करून काय होणार आहे. इथे सगळं जग निसर्गाचे शोषण करत आहे,संसाधनांची उधळपट्टी करत आहे पण, ह्या बहूमतापासुनी वेगळ्या लोकांसाठी ही कर्तव्यपूर्तीची भावना केवळ निसर्गाला वाचवण्यासाठी नसते तर अधिक चांगला माणूस बनून आत्मउन्नती साठी असते. दिलीपदादा, पौर्णिमाताई यांच्यासारखे पती-पत्नी त्यांच्या परस्पर प्रेरक जीवनशैलीने एका कुटुंबाचं आणि समाजाचं भलं करतात. भावी पिढीवर योग्य संस्कार करतात. त्यांना प्रेरणा देतात. हजारातून एखाद्याला तरी या विचारांनी प्रेरित होऊन या जीवनशैलीतला काही भाग जरी अंगीकारावा वाटला तरी त्यांची निसर्गाप्रती असणारी तळमळ सार्थ ठरेल असं म्हणता येईल.