इंडिया दर्पण विशेष – निसर्ग यात्री
नागा लेडी: अकाइना गोनमेइ
नागालँडसारख्या दुर्गम भागात विकासाची कामं करणं अत्यंत गुंतागुंतीचे असतं. अत्यंत दुर्गम असा हा प्रदेश, अडाणी अंधश्रद्धाळू लोकं, मूलभूत सोयीसुविधांचाही अभाव इ. अनेक जटिल समस्यांवर मात करत तिथल्या लोकांच्या विकासासाठी अकाईना गोनमेई गेली तीस वर्षाहून अधिक काळ काम करत आहेत.त्यांच्या आगळ्यावेगळ्या प्रयोगांचा हा लेखाजोखा…
नागा रोंगमेई समुदाय धार्मिक आणि जातीनिहाय समजुतींवर आधारलेला आहे. अशा समुदायासोबत काम करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. कोणत्याही मागास आदिवासी जमातीतले लोक नवीन कल्पनांना चटकन प्रतिसाद देत नाहीत. नवीन कार्यसंस्कृती आपलीशी करायला त्यांना वेळ लागतो. जुनी मूल्य सोडताना खूप वेळ जातो, वादविवाद होतात,मतभेद होतात. नागा तरुण हा गोंधळलेला असतो.
अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा, उच्च शिक्षणाचा अभाव यामुळे त्यांना तांत्रिक अडचणी कायम जाणवतात. परंतु, अकाईना यांचा संयमाचा आणि चिकाटीचा हा प्रवास वेळोवेळी परीक्षा पाहणारा ठरला. नागा जमातीच्या कोणत्याही श्रद्धेला धक्का न पोहोचवता समाजात विकासाचं नवीन मॉडेल त्यांनी आकाराला आणलं. सुरवातीच्या काळात नागालँडसारख्या दुर्गम भागात लोकांना पिण्याचे पाणी मिळणेदेखील अत्यंत कठीण होतं. नदीवर जाऊन पाणी भरून आणण्यासाठी स्त्रियांना, मुलींना कित्येक मैल तंगडतोड करावी लागत असे.
एकदा पाणी भरायला गेलेली एक मुलगी अचानक आलेल्या पुरात वाहून गेली आणि त्या घटनेने अकाईना पुरत्या हादरल्या. यावर ताबडतोब काहीतरी उपाय करायला हवा असं ठरवलं. आवारातल्या विहिरींना सिमेंट काँक्रीटची कुंपणं घातली. त्यानंतर सर्वांना स्वच्छ पिण्याचं पाणी मिळू लागलं. पण यातुन एक वेगळीच समस्या वेगळीच समस्या निर्माण झाली.नागालँडमध्ये मृतांना राहत्या घराच्या परिसरातच दफन करण्याची पद्धत आहे. त्यामुळे जसजशी घरांची संख्या वाढायला लागली, मोकळ्या जागा कमी होऊ लागल्या.तसतशी जमिनीतून विहिरीत झिरपणारं पाणी दूषित होऊ लागलं. मग वेगळ्या स्मशानभूमीची मागणी ,त्याची व्यवस्था यासारख्या असंख्य गुंतागुंतीच्या समस्यांना तोंड देत नागालँडमध्ये अकाईना अथक परिश्रम करत आहेत.
अकाईना गोन्मेई म्हणजे नागाविकासाची मशाल . समाजकार्याचं रीतसर प्रशिक्षण घेतलेली रोंगमेई समुदायातील ही पहिली स्त्री. अकाईना यांचा जन्म 1968 मध्ये दिमापूरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील आलोतदी कामेइ हे सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी होते. तर आई आजिन कामेई यांचं शालेय शिक्षण झालेलं नसलं तरी त्या अत्यंत व्यवहार चतुर होत्या. त्या दोघांच्या आचार-विचारांचा अकाइना यांच्यावर खूपच प्रभाव होता. त्यांना त्या त्यांचे सर्वोच्च प्रेरणास्थान मानतात. अकाईना दिमापूरसारख्या शहरी वातावरणात वाढल्या. गुवाहाटीमधून होमसायन्सची पदवीप्राप्त केली. त्यानंतर मुंबईत येऊन मुंबईच्या निर्मला निकेतनमधून एम एस डब्ल्यू हा कोर्स पूर्ण केला.
खरंतर इतर भावंडांप्रमाणे त्याही परदेशात नोकरी करून तिथे स्थायिक होऊ शकत होत्या. परंतु त्यांनी दिमापूरला परतण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्या गावांमध्ये फिरत, लोकांना भेटत तेव्हा त्यांनी पाहिलं की, त्या भागातली पारंपारिक झूम पीकपद्धती आता त्यांना उपयुक्त ठरत नव्हती. झुम पीक पद्धती म्हणजे पेरणीपूर्वी शेत जमिनीवरची सर्व झाडं झुडपं जाळून टाकणे. शेती पद्धतीत काहीतरी बदल करणं अपरिहार्य होतं. लोकांना दोन वेळचं अन्न मिळणंदेखील कठीण झालं होतं. त्यावेळी केवळ धार्मिक प्रवचने देऊन नुसतं हातावर हात ठेवून बसून काही होणार नाही, परिस्थिती बदलण्यासाठी बरंच काही करण्याची गरज आहे या सत्यावर अकाईना यांनी बोट ठेवलं.
लोकांनी त्यांच्या योजनांना बराच विरोध केला पण माणसाची अन्न ही प्राथमिक गरज भागावी असं वाटत असेल तर त्यासाठी पिकं पिकवता आली पाहिजे. त्यासाठी कोणताही दैवी जादूचा मंत्र वापरून धान्य पिकवता येत नाही. अकाईना यांनी एक संस्था स्थापन केली आणि त्यांच्या संस्थेने वाडी पद्धतीच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं. वाडी पद्धत म्हणजे फळ बागायती शेती. डोंगर उतारांवर अननसाच्या लागवडीची सुरुवात केली. ह्यात जरी फारसे उत्पन्न मिळालं नाही तरी एक चांगला प्रयोग म्हणून त्याकडे पाहिलं गेलं.नागालँडमध्ये मशरूम शेतीची खरंतर अजिबातच माहिती नव्हती.
बहुतेकदा जंगलामधूनच मशरूम गोळा केले जात पण एकदा अकाईना आपल्या कुटुंबासोबत थायलंड येथे गेलेल्या असताना त्यांनी लाकडाच्या भुशावर केली जाणारी ऑईस्टर मशरूमची शेती पाहिली. त्यासाठी लाकडाचा भुसा भरलेल्या पाण्याच्या जुन्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर केला गेला होता. ही शेती घराच्या मागच्या शेडमध्ये करणं सहज शक्य होतं. घरातल्या स्त्रियांना अशा शेतीने एकावेळी 500 ते एक हजार मशरूम पॉटस ची देखभाल करणं सहज शक्य होतं. मग त्यांनी थायलँडला या संस्थेकडे पाठपुरावा करून आपल्या दोन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी थायलंडला पाठवलं आणि त्यानंतर नागालँड मधल्या शेतकऱ्यांना, महिला स्वमदत गटांना या शेतीचं प्रशिक्षण देण्याचं काम सुरू केलं.
सध्या या संस्थेने अनेक महिलांना मशरूम शेतीचे प्रशिक्षण दिले. मशरूम शेती ही भरभरून उत्पन्न मिळवून देणारी शेती आहे. त्यामुळे सर्वप्रकारे तिथल्या लोकांची भरभराट सुरू झाली. कुटुंबातल्या मुलांना पौष्टिक आहार मिळू लागला. तालुक्याच्या खोऱ्यातल्या बहुतेक गावांमध्ये आता आठवडी बाजार भरतात. मालाची खरेदी विक्री होते. म्हणजेच तिथली आर्थिक चक्र वेगाने फिरू लागली.
अकाईना आयुष्यभर लढवय्या बाणा जपत आल्या. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांनी कायम कामाला प्राधान्य दिले. अकाईना या नावाचा अर्थच असा आहे की एक अशी व्यक्ती जिला दोनशे लोक आपला आदर्श मानतात त्यांच्या आयुष्यातील संघर्षमय कालखंडात त्यांनी आपलं नाव खरोखर सार्थ करून दाखवलं आहे. वेळोवेळी उभ्या राहणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी त्या इथल्या स्थानिकांसोबत खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या.
समाजाच्या त्या त्या वेळच्या गरजा ओळखून त्यानुसार वेळोवेळी आपल्या कामांमध्ये बदल केले. स्वतःच्या जमातीसाठी काहीतरी भरीव काम करावं म्हणून तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांची एक छोटीशी फौज तयार केली.आणि आजही अकाईना गोन्मेई त्यांच्या पतीच्या सहकार्याने उत्कृष्ट काम करत आहेत. आपल्या मातृभूमीच्या विकासासाठी आपलं आयुष्य देणाऱ्या अकाईना गोन्मेई यांचं कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.