इंडिया दर्पण विशेष – नमामी गोदा
कुंभमेळा आणि गोदावरी
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होतो, हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. कुंभमेळ्यात गोदावरी नदीमध्ये आंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात, अशी श्रद्धा आहे. अमृताचा थेंब नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पडला म्हणून तेथे स्नान केले की पाप निघून जाते. यात खरंच तथ्य आहे का?
जलत्ज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांचं एक पुस्तक आहे “केवल स्नान नही है कुंभ”. २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होण्यापूर्वी एकदा राजेंद्र सिंह नाशिकला आले होते. तेव्हा त्यांनी समजावून सांगितलं की, फक्त अंघोळ केल्याने पाप धुतले जात नाही. 700 वर्षांपूर्वी कुंभमेळा म्हणजे वेगळीच संकल्पना होती. गोदावरी नदीच्या संरक्षण आणि संवर्धनात त्याचा महत्त्वाचा संबंध आहे.
हरिद्वार येथे एकेकाळी एक घटना घडली. एका विशिष्ट महिन्यात धरती मातेवर नांगर चालवत नाहीत. ते निषिद्ध असते अशी मान्यता होती. कारण त्यावेळी धरती माता गरोदर असते, असे मानतात. गंगा नदीच्या हद्दीत शेती करण्यासाठी त्या वर्जित महिन्यात काही लोकांनी नांगरले. त्यावरून मोठा वाद झाला. नदी किनारी त्याकाळी गुरुकुल असायचे. ऋषीमुनी तेथे राहत असत. समाजाला ज्ञानार्जन करीत असत. सर्व लोक त्यांच्याकडे गेले. त्यांना म्हणू लागले की, नदीच्या हद्दीत नांगरण्यावरून ऋषीमुनींनी लोकांना का नाही अडवलं.
ऋषी म्हणाले की, हा विषय आमच्या एकट्याकडून सुटणार नाही. हा विषय खूप गंभीर आहे. आणि आमची एकट्याची जबादारी नाही. आपण राजाला पण सांगायला हवे. मग ठरले की राजा, प्रजा आणि संत (विद्वान) यांनी एकत्र बसायचं आणि ठरवायचे. मग त्याकाळी राजा, प्रजा आणि विद्वान मंडळी एकत्र बसले. “समुद्राइतके खोल विचार मंथन” केल्या गेले. मग नदीसाठी, संस्कृतीसाठी, समाजासाठी चांगलं म्हणजेच पुण्य काय? आणि वाईट म्हणजे पाप काय? यावर खूप सखोल चर्चा झाली. निष्कर्ष निघाले. त्यावर राजाने शिक्कामोर्तब केले. समाजाला दिशा देण्याचे, समाजासाठी, संस्कृतीसाठी पाप आणि पुण्य म्हणजे चांगलं आणि वाईट याची व्याख्या ठरु लागली. अलाहाबाद, उज्जैन, नाशिक येथेही अशाच प्रकारे नागरिक एकत्र आले आणि तेथेही निर्णय होऊ लागले. राजाने शिक्कामोर्तब करून त्याला कायद्यात रूपांतर केले.
पूर्वीच्या काळी कुंभाचा आदेश जगाला मार्गदर्शक ठरत असे. आपल्या नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे गत सिंहस्थ कुंभमेळा आपण सर्वांनी मिळून “हरित कुंभमेळा” म्हणून साजरा केला. तो याच अनुषंगाने. सरकार, समाज आणि विद्वान लोकांना एकत्र करून कुंभमेळा गोदावरीला समर्पित केला. आपण सर्वांनी मिळून त्यावेळी खूप विविध उपक्रम केले. जगाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. आपण काय काय उपक्रम केले त्यात कोणी कोणी महत्वाची भूमिका केली याचा आढावा आपण पुढच्या लेखात नक्कीच घेऊ..