बारा मोटेची विहीर
नमस्कार, आपल्या हटके डेस्टिनेशन या मालिकेत आपण देशातील विविध हटके पर्यटन स्थळांची माहिती घेत आहोत. यात यावेळी ज्या पर्यटन स्थळाची माहिती घेणार आहोत, त्या सातारा जिल्ह्यातील शिवकालीन बारा मोटेच्या विहिरीस मी प्रथमच भेट दिली. खरंतर आपल्याकडे अशी हजारो दुर्लक्षित पर्यटन स्थळे आहेत, ज्यांचे बद्दल अजूनही फारशा पर्यटकांना माहिती नाही. यासाठी शासन स्तरावरही फार काही विशेष प्रयत्न होत असल्याचे दिसत नाही. आपल्याला गुजरात मधील राणी की बाव ही कलात्मक बांधणी केलेली विहीर माहित असते. पण आपल्या जवळच्या सातारा जिल्ह्यातील आकर्षक १२ मोटेची विहिरी बाबत कल्पना नसते. चला तर मग पुणे-बंगळुरू महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील लिंब गावाजवळच्या “बारा मोटेच्या विहीरीबाबत” आपण आज जाणून घेऊया…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक गड-किल्यांची बांधणी झाली. प्रत्येक किल्याची आखणी वेगवेगळी दिसून येते. मात्र स्वराज्यासाठी किल्ले जिंकत असतांना अथवा त्यांची उभारणी होत असतांना शिवकाळात रयतेच्या पाणी, रस्ते अशा मूलभूत गरजांकडेही लक्ष दिले जात असे. याचाच पुरावा म्हणजे सातारा शहराजवळच्या लिंब गावातील १२ मोटेची विहीर हा आहे.
आपण सर्वसाधारणपणे एक मोट (पुर्वी विहिरीतून पाणी काढण्यासाठी मोठी चामडी पिशवी विहिरीत सोडली जात असे. बैलांच्या माध्यमातून पाणी मोटेच्या सहाय्याने वर ओढले जाई. यास मोट असे म्हणत) असलेली विहीर बघितली असेल. पण या ठिकाणी एकाचवेळी बारा मोटा चालतील अशी शंकराच्या पिंडीच्या आकाराची विहीर बांधण्यात आलेली आहे.
ही बारा मोटेची विहीर संभाजीराजे यांचे सुपुत्र शाहू महाराज यांच्या काळात सन १६४१ ते १६४६ दरम्यान विरुबाई यांनी खोदली. या विहीरीची खोली ११० फूट असून व्यास साधारण ५० फूट आहे. या विहिरीस प्रत्यक्ष भेट दिल्यावर काही गोष्टी आढळतात. त्यात प्रामुख्याने विहिरीस बारा मोटेची विहीर असे संबोधण्यात येत असले तरी प्रत्यक्षात १५ मोटांची व्यवस्था केल्याची दिसते. याचा अर्थ दोन मोटा या अडीअडचणीच्या वेळी (स्टॅंन्डबाय) वापरायच्या व प्रत्यक्षात बारा मोटांनीच पाणी उपसायचे.
तसेच ही विहिर फक्त पाण्याच्या सोयीसाठी खोदण्यात आलेली नाही, तर या विहीरीत गुप्त खलबते करण्यासाठी काही खास जागा बनवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ही विहीर केवळ विहीर नसून एक छोटासा छुपा राजवाडा आहे, असेही आपण म्हणू शकतो. तसेच विहीर शत्रू सैन्याच्या नजरेस येऊ नये म्हणून या परिसरात ५०० एकरमधे आंब्याचे विशाल वृक्ष लावण्यात आले. त्यांच्या सावलीत ही विहीर लपवण्याची शक्कल लढवलेली दिसते.
विहीरीतून १२ मोटांच्या सहाय्याने पाणी उपसले जात असले तरी प्रत्यक्ष विहीरीत उतरण्यास प्रशस्त पायर्या आहेत. या पायर्यांचा उपयोग स्थानिक महिलांना घरगुती कामासाठी पाणी आणण्यासाठी तसेच गुप्त बैठकीच्या जागी पोहचण्यासाठी होत असे. या विहिरीत ठराविक पायर्यांनंतर आकर्षक दगडी कमानी आहेत. विहिरीवर देवनागरी लिपीत शिलालेख कोरले आहेत. विहीर कुणी बांधली याबाबत माहीती आहे. मुख्य अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस चार वाघांची शिल्पे आहेत. या वाघांच्या पायाखाली हत्ती असून वाघाने हत्ती म्हणजे मुगल बादशहाचे वाहन असलेल्या हत्तीस पायाखाली दाबून मारले व नंतर खाल्ले असल्याचे दर्शविण्यात आल्याचे दिसते.
दक्षिणेकडील दोन वाघांच्या पायात हत्ती असून उत्तरेकडील वाघ आकाशात झेप घेत आहेत, असे दिसते. याचा अर्थ महाराजांनी दक्षिणेत विजय प्राप्त केला असून आता ते उत्तरेकडे झेप घेणार असे दर्शविण्यात आले आहे. संपुर्ण विहिरीस वरुन बघितल्यास शंकराच्या पिंडीचा आकार दिसतो, मात्र याठिकाणी नंदी हा विहीरीबाहेर एका वड व पिंपळाच्या एकत्रित झाडाखाली स्थापित केलेला आहे. अशा या शिवकालीन विहिरीस जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट द्यावी असे वाटते.
कसे पोहचाल
सातारा येथे जाण्यासाठी जवळचे विमानतळ हे पुणे येथे ११२ किमी अंतरावर आहे. तसेच सातारा हे पुणे-बंगळुरू हायवेवर असल्याने लिंब गाव या हायवेपासून फक्त ६ किमी अंतरावर आहे.
कुठे रहाल
सातारा येथे सर्व दर्जाची हाॅटेल्स आहेत.
केव्हा जावे
या ठिकाणी वर्षभर केव्हाही गेले तरी चालते.