इंडिया दर्पण विशेष लेखमाला – परदेशातील सुप्रसिद्ध मंदिर
बांतेय श्रेई’: दगडांवर उमटलेली कलात्मक कविता!
दक्षिण आशिया खंडातील कम्बोडिया देश म्हणजे भारतीय संस्कृती आणि भारतीय मंदिरांच्या दृष्टीने चमत्कारच मानावा लागेल. बाराशे तेराशे वर्षांपूर्वी येथे हजारो हिंदू देवतांची मंदिरं बांधण्यात आली. त्यानंतर या मंदिरांवर मानवी आणि नैसर्गिक विपदा आल्या. कम्बोडियात आलेल्या प्रलयंकारी भूकंपाने ही मोठ मोठी मंदिरं जमिनीच्या पोटात गडप झाली. पुढची दोन तीन शतके ही मंदिरं जमिनीखालीच दडून राहिली. त्यावर घनदाट जंगलं-अरण्ये उगवली. त्यानंतर काही जिद्दी संशोधकांनी ही मंदिरं घनदाट अरण्याखालून खोदून वर काढली. त्यांचे पुनरनिर्माण केले. आज हीच मंदिरं जगभरातील लाखो करोड़ो पर्यटक, अभ्यासक आणि भाविकाना आपल्याकडे आकर्षित करीत आहेत.
कम्बोडियात जाणारे पर्यटक ‘अंग्कोर वाट’ला नजरेसमोर ठेवून आपल्या ट्रीपचे आयोजन करतात. परंतु या मंदिरांच्या आसपास देखील अनेक वैशिष्ट्येपूर्ण मंदिरं आहेत. बाहेरच्या देशांतून आलेले पर्यटक ही सर्वच मंदिरं पाहू शकत नाहीत. या मंदिर समुहा पासून सुमारे २५ किमी अंतरावर ‘बांतेय श्रेई’ ( Banteay srei) नावाचे एक अदभुत मंदिर आहे. येथे आल्यावर हे मंदिर अवश्य पहावे.
‘बांतेय श्रेई’ ( Banteay srei) मंदिराची निर्मिती दहाव्या शतकांत झाली आहे.इ.स. ९६७ मध्ये हे मंदिर बांधून तयार झाले होते. अंग्कोर वाट येथील हे एकमेव मंदिर असे आहे जे एखाद्या राजाने बांधलेले नाही. राजा राजेन्द्र वर्माचा एक मंत्री यज्ञावहर याने हे मंदिर बांधले आहे. सुरुवातीला हे भगवान शिवाचे मंदिर होते आणि त्याचे नावही होते ‘त्रिभुवन महेश्वर’. बाराव्या शतकातील एका शिलालेखानुसार राजाने हे मंदिर राज पुजारी पंडित दिवाकर यांना अर्पण केले. त्यांनीही या मंदिराची पुन्हा शिव मंदिराच्या रुपांत स्थापना केली. यावरून असं लक्षांत येतं की पुढे कधीतरी हे मंदिर राजाच्या ताब्यात गेलं आणि त्याने इथली प्रमुख देवता बदलली.
चौदाव्या शतकापर्यंत हे मंदिर जिवंत असल्याचे पुरावे आहेत. कालांतराने हे मंदिर घनदाट आरण्यातील जमिनीत हे मंदिर गडप झाले. इ.स. १९१४ मध्ये केलेल्या उत्खानानत हे मंदिर पुन्हा जशेच्या तसे सापडले. याचे श्रेय फ्रेंच पुरातत्ववेत्त्यांना दिले पाहिजे करण त्यांनीच हे मंदिर मोठ्या प्रयासाने शोधून काढले. इ.स. १९३० साली anastylosis अॅनास्टिलॉसिस पद्धतीने या मंदिराची पुर्निर्मिती करण्यात आली.अॅनास्टिलॉसिस पद्धतीत जिग्सॉ पझल्स प्रमाणे इमारतीचे इतस्तत: विखुरलेले भाग एकमेकांना जोडतात.या जोडलेल्या भागांच्या जागा निश्चित करून त्यांना चिन्हांकित करतात. उरलेल्या इमारतीच्या रचने विषयी शंका असेल तर सर्व दगड काढून ते पुन्हा त्यांच्या योग्य जागी लावतात. हे दगड पक्के राहण्यासाठी काही ठिकाणी नवीन पदार्थांचीही मदत घेतली जाते.
‘बांतेय श्रेई’ ( Banteay srei) सारखे पूर्णत: शिल्पांनी तयार झालेले मंदिर सपाट किंवा प्लेन मंदिरांच्या तुलनेने लवकर जोडले जाते. कारण एखादे शिल्प किंवा त्याचे भाग पझल्स सारखे जोड़ने सोपे असते. दगड जर सपाट प्लेन असतील तर मात्र ते जोड़ने अवघड जाते. कारण कोणता दगड कोठे असेल ते शोधने अवघड असते. अशा पद्धतीने या मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात आले. लाल-गुलाबी वालुकामय दगडापासून तयार करण्यात आलेले हे मंदिर अंग्कोर वाट च्या इतर मंदिरापेक्षा वेगळे आहे. धूसर राखाडी रंगाच्या वालुकामय दगडा पासून हे मंदिर बनविलेले आहे. इथल्या इतर मंदिरापेक्षा आकाराने हे मंदिर लहान आहे परंतु कलात्मक दृष्टया या मंदिराला तोड़ नाही.
भारतीय वास्तुशास्त्रानुसार निर्माण करण्यात आलेले हे मंदिर पुर्वाभिमुख आहे. मंदिराला तीन गोपुरं अर्थांत तीन प्रवेशव्दार आहेत. यातून मुख्य मंदिरात येतात. येथे दक्षिण आणि उत्तरेला दोन विशाल भवनं आहेत.ख्मेर वास्तुशास्त्रत या भवनांना ‘लायब्ररी’ म्हणतात. तिसर्या गोपुरा समोर दोन्ही भवनामधून मंडपातून मुख्य मंदिरा पर्यंत जाता येते. मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूंना दोन मंदिरं आहेत.यातील एक मंदिर भगवान विष्णु यांना तर दुसरे मंदिर भगवान शिवाला समर्पित केलेले आहे. पर्यटकांच्या गर्दी पासून मंदिराच्या भिंतींचा बचाव करण्यासाठी मंदिराच्या भिंती समोर दोर्या बांधलेल्या आहेत. यामुळे मुख्य प्रांगणत जाता येत नाही परंतु या मंदिरातील अदभुत शिल्पकलेचा आस्वाद मात्र मनमुराद घेता येतो.
पहिल्या गोपुराच्या दर्शनी भागाच्या वरचा त्रिकोणी भागावर त्रिमुखी ऐरावतावर बसलेला इंद्र, दुसर्या गोपुरावर गजलक्ष्मी विराजमान आहेत.येथून आत गेल्यावर खंडित झालेला नंदी कालचक्राचा महिमा मूकपणे सांगतो असे वाटते. तिसर्या गोपुराच्या पूर्व भागावर नटराज रुपातील शिव तर पश्चिमभागावर दुर्गा देवी कोरलेली आहे. दक्षिण भवनाच्या वरच्या गोलाकार घुमटावरील त्रिकोणी आकारच्या दरवाजावर शिल्पकाराने रावणाने कैलास पर्वत उचलण्याचा प्रसंग चित्रित केला आहे. रावणाने गर्वाने कैलास पर्वत उचलून लंकेला नेण्यासाठी उचलण्याचा प्रयत्न केला यावेळी भगवान शिवाने आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने रावणाला कैलास पर्वता खाली दाबले. तेव्हा रावणाने शिवस्तुती आरंभली. काही वर्षे तपश्चर्या केल्यावर महादेवाने त्याच्यावर कृपा करुन त्याला सोडले. हे शिल्प इतकं बोलकं आहे की त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अशीच इतर शिल्पंही बोलकी आहेत. ही केवळ शिल्पं नाहीत तर दगडातून साकारलेल्या कविता आहेत.
मुख्य मंदिर तसेच त्याच्या उत्तर व दक्षिणेला असलेल्या मंदिरांच्या दरवाजावर आणि छतांवर नंदीवर बसलेले उमा महेश्वर, रेड्यावर बसलेले यमराज, धनदेव कुबेर,तीन हंसांवर बसलेले वरुणदेव, जरासंधवध आदि प्रसंग साकार करण्यात आले आहेत.
वास्तुशास्त्रा नुसार उत्तरेला कुबेर,दक्षिणेला यम, पूर्वेला इंद्र तर पश्चिमेला वरुण यांची स्थापना केलेली आहे. कारण या देवता या दिशांच्या दिक्पाल आहेत. या मूर्ती सजविन्यासाठी फुलपट्टी, लता, मकर आदींचा मनसोक्त वापर केलेला आहे. आपली नजर जाइल त्या काना कोपर्यात वानर,पक्षी, वाघ, यांच्या मुखाकृती दिसतात. शिल्पकलेचे जणु भंडारच या मंदिरावर ओतले आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. हे सर्व प्रसंग जरी भारतीय असले तरी या सर्व शिल्पाकृती कम्बोडियन कलाकारांनी साकार केलेल्या आहेत हे स्पष्टपणे लक्षांत येते.
‘बांतेय श्रेई’ ( Banteay srei) येथील शिल्पकला पाहून आश्चर्यचकित न झालेला पर्यटक अजून जन्माला यायचा आहे!