नवी दिल्ली – देशातील कोळशाचे संकट आणखी गडद होत चालले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये औष्णिक ऊर्जा प्रकल्पांचे अनेक युनिट बंद करण्याची वेळ आली आहेत. याबाबत कोल इंडिया लिमिटेडने सांगितले की, ग्राहकांसाठी वीज तयार न करणाऱ्या कंपन्यांना कोळशाचा पुरवठा करणे बंद केले आहे. याचा थेट परिणाम त्या कंपन्यांच्या उत्पादनावर झाला आहे.
कोल इंडियाने म्हटले आहे की, भारतात गेल्या काही वर्षांतील विजेची सध्याची सर्वात वाईट परिस्थिती असून वीज पुरवठ्याच्या नुकसानीशी आम्ही लढत आहोत. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कोळसा उत्पादक देश असून जगातील चौथा सर्वात मोठा साठा आपल्या कडे आहे. परंतु सध्या तरी जगातील सर्वात मोठी कोळसा खाण कंपनी म्हणजे कोल इंडिया ही आधीपेक्षा विजेची मागणी आणखी वाढल्यानंतर यापुढे पुरेसे पुरवठा करू शकणार नाही.
कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही वीज क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रांसाठी कोळशाचा ऑनलाइन लिलाव थांबवला आहे. राष्ट्राच्या हितासाठी, वीज केंद्रांमध्ये कोळशाच्या कमी साठ्याची परिस्थिती हाताळणे आणि त्यांना पुरवठा वाढवणे ही केवळ तात्पुरती प्राथमिकता आहे. तर दुसरीकडे अॅल्युमिनियम असोसिएशन ऑफ इंडिया ने पूर्वीप्रमाणे पुरवठा त्वरित सुरु करण्याची मागणी केली.
असोसिएशनने निवेदनात म्हटले आहे की, दोन तासांपेक्षा जास्त काळ वीज पुरवठा बंद राहिल्याने अनेक कंपन्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. अनेक अॅल्युमिनियम प्लांट्स आधीच कमी क्षमतेने कार्यरत आहेत कारण त्यांचा कोळसा शिल्लक साठा एप्रिलनंतर सुमारे १५ दिवसांवरून ३ दिवसांवर आला आहे. कोळशावर अवलंबून असलेले अनेक उद्योग आता मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यांना खुल्या बाजारातूनही कोळसा उपलब्ध होणे अवघड असल्याने मोठाच पेच निर्माण झाला आहे. परिणामी, या उद्योगांवर मोठी टांगती तलवार आहे.