मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुमारे ४० दिवसांच्या दिर्घ प्रतीक्षेनंतर राज्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, एकनाथ शिंदे गटाचे ९ आणि भाजपचे ९ अशा एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह २० जण राज्याचा कारभार बघत आहेत, परंतु महाविकास आघाडीमध्ये जसे तिन्ही पक्षांचे मंत्री एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते, त्यातून जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊन संभ्रम निर्माण होत होता. आता पुन्हा तसा प्रकार घडू नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक घेऊन त्यामध्ये पूर्वीच्या सरकार सारखा प्रकार घडू नये यासाठी मंत्र्यांना जणू काही दमच भरला आहे,.
शिंदे आणि फडणवीस हे नव्या १८ मंत्र्यांना म्हणाले की, “चांगला कारभार करा. तुमच्यावर आमची नजर आहे हे लक्षात ठेवा. चुकीचे निर्णय घेतले तर तुमचे समर्थन करणार नाही. मंत्र्यांनी एकमेकांवर टीका केली तर याद राखा”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नव्या मंत्र्यांना मंत्रालयातील बैठकीत दम भरला असल्याचे कळते आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि शिंदे गटातील मंत्र्यांचं ‘बौद्धिक’ घेत या नव्या मंत्र्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सावधानतेचा इशारा दिला आहे. “ लक्ष आहे आमचं, ” असे म्हणत त्यांनी मंत्र्यांना इशारा दिला असून मंत्रिमंडळ बैठकीनंतर अधिकाऱ्यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि शिंदे गटातील मंत्र्यांचं ‘बौद्धिक’ घेतले.
शिंदे गटातल्या मंत्र्यांना तर चांगलीच तंबी दिल्याची माहिती आहे. शिंदे गट व भाजपचे नवनिर्वाचित मंत्री आणि मंत्रीपदावर वर्णी न लागल्यामुळे नाराज झालेल्यांमधील मतभेद कोणत्याही क्षणी बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतभेद आणि परस्परांवर टीका करणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला. यामुळे नव्या सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या बैठकीला नवनिर्वाचित मंत्री सुधीर मुनगंटीवार वगळता सर्व नवीन मंत्री उपस्थित होते. सर्वांना जबाबदारीने वागण्याचा सल्ला देण्यात आला. त्याचवेळेस चुकीचे निर्णय घेणाऱ्यांची बाजू घेतली जाणार नाही. तुमच्या चुकांवर पांघरूण घातले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या ताकदीमुळे राज्यात नवे सरकार स्थापन झाल्याची जाणीव या बैठकीत सर्व मंत्र्यांना करून देण्यात आली. केंद्रांच्या योजनांच्या अंमलबजावणीची आठवणही करून देण्यात आली. केंद्र सरकारने राज्याला मागील अडीच वर्षांत केंद्रीय योजनांबाबत स्मरणपत्रे पाठवली, पण योजनांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे केंद्राच्या योजनांची राज्यात अंमलबजावणी करून महाराष्ट्र राज्य केंद्र सरकारसोबत आहे, हे आपल्याला केंद्राला दाखवून द्यायचं आहे, असेही या बैठकीत सांगण्यात आल्याच समजते.
CM Eknath Shinde DYCM Devendra Fadanvis to New Ministers