नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदी उदय लळीत हे मराठमोळे व्यक्तिमत्व विराजमान झाले आहे. सरन्यायाधीश लळित यांनी पदभार घेताच कामांचा धडाका लावला आहे. त्यांच्या नेतृत्वात सर्वोच्च न्यायालयाच्या कामगिरीने वेग पकडला आहे. केवळ चार दिवसांत त्यांनी विक्रमी म्हणजे जवळपास १३०० खटल्यांचा निपटारा केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपद स्वीकारल्यानंतर न्यायालयातील वर्षानुवर्षे सुरु असलेली ‘तारीख पे तारीख’ची परंपरा मोडीत काढण्याच्या दिशेने लळीत यांनी ठोस पाऊल टाकले आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे काम सुरु झाल्याने सर्वसामान्यांना न्याय मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.
नुकतेच सेवानिवृत्त झालेले माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी निवृत्तीच्या दिवशी तारीख पे तारीखच्या मुद्द्यावर खंत व्यक्त केली होती. तारीख पे तारीखकडे लक्ष देऊ न शकल्याची खंत व्यक्त केली होती. त्यावेळी नवीन सरन्यायाधीश लळीत यांनी प्रलंबित खटल्यांकडे गांभीर्याने लक्ष देणार असल्याचा निर्धार केला होता. त्यानुसार खटले निकाली काढण्याचा धडाका त्यांनी लावला आहे. गेल्या चार दिवसांत १२९३ प्रकरणे निकाली काढण्यात त्यांना यश आले आहे. त्यापैकी ४४० बदली प्रकरणे आहेत.
गेल्या दोन दिवसांत १०६ नियमित प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची माहिती सरन्यायाधीश लळीत यांनी दिली आहे. बार कौन्सिलतर्फे आयोजित सत्कार कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. “आम्ही नियमित खटले निकाली काढण्यावर अधिक भर देत असून न्यायालय खटल्याचा जलद निपटारा करण्याची ही पद्धत कायमस्वरुपी सुरू ठेवेल. न्यायालय आता पूर्वीपेक्षा जास्त प्रकरणांचे लिस्टींग करत आहे. अर्थात जास्त खटले सुनावणीसाठी घेत आहे”, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरन्यायाधीश उदय लळीत हे भारताचे ४९वे सरन्यायाधीश आहेत. ते कोकणातील देवगड तालुक्यातील असून, त्यांच्या नियुक्तीने मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलली आहे. सरन्यायाधीशांच्या धडाकेबाज, विक्रमी कामगिरीमुळे संपूर्ण देशवासियांना वेळीच न्याय मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. उदय लळीत यांचा कार्यकाळ केवळ ७४ दिवसांचा आहे. अशा परिस्थितीत त्यांना जास्तीत जास्त खटल्यांची सुनावणी कमी वेळेत पूर्ण करायची आहे. येत्या ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.
Chief Justice of India Uday Lalit Fast Work
Supreme Court Pendency Fast Track Cases Dispose