मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या उपाधी आणि विशेषणं देण्यावरून महाराष्ट्रात चांगलच राजकारण सुरू आहे. अलीकडेच अजितदादांनी संभाजीराजेंना धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक म्हटले पाहिजे, असे विधान सभागृहात केले होते. त्यावर शरद पवारांनी ठाण्यातील एका दिवंगत नेत्याला धर्मवीर म्हटले जाते, याचा खोचकपणे उल्लेख केला होता. आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांना जाणता राजा म्हणायला काय हरकत आहे, असा सवाल करून नवी चर्चा छेडली आहे.
शरद पवार यांनी संभाजीराजेंच्या संदर्भात म्हटले होते की, ‘त्यांना धर्मवीर म्हणा किंवा स्वराज्यरक्षक म्हणा, काहीही फरक पडत नाही. कारण राजेंचं कार्यकर्तृत्व मोठं आहे. उपाधीवरून राजकारण करण्याची गरज नाही.’ पण अजितदादांच्या विधानावरून मात्र सत्ताधारी चांगलेच पेटले आहेत. अनेक ठिकाणी अजितदादांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. काहींनी सडेतोड प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी राष्ट्रवादीचे अनेक नेते अजितदादांच्या बाजुने भूमिका मांडताना दिसले.
छगन भूजबळ यांची गाडी मात्र नेहमी वेगळी धावत असते. त्यांच्या विधानात काहीतरी असं असतं ज्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाला चर्चा करायला खाद्य मिळतं. आता त्यांनी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांना जाणता राजा म्हणायला काय हरकत आहे, असा थेट सवाल केला आहे.
राज्यकर्ता म्हणजे जाणता राजा
जो राज्यकर्ता असतो त्याला पूर्वी जाणता राजा म्हणत असे. शरद पवार यांनी सत्तेत असताना दिन-दलितांचे, उपेक्षितांचे कल्याण केले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. उद्योग आणले, शिक्षणाचे नवे मार्ग खुले केले. महिलांसाठी नवनव्या योजना आणल्या. त्यामुळे त्यांना जाणता राजा म्हणायला काहीच हरकत नाही. कारण जो जनतेचे भले जाणतो तो जाणता राजा असतो, असे छगन भुजबळ म्हणाले.
राज्यपालांनी काय केलं?
काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सातत्याने महापुरुषांचा अपमान करीत आहेत. भाजपच्या नेत्यांनीही तीच मालिका कायम ठेवली आहे. अश्यात अजितदादांनी काय चुकीचं केलं. त्यांनी संभाजीमहाराजांना स्वराज्यरक्षक म्हटलं आहे. पण तुम्हाला धर्मवीर म्हणायचे असेल तर नक्कीच म्हणा. तेही चुकीचं नाही, असेही छगन भुजबळ म्हणाले.
Chhagan Bhujbal on NCP Chief Sharad Pawar Janta Raja
Politics