नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महिला ही अबला नाही तर सबला आहे. आपल्या आणि आपल्या कुटुंबाची प्रगती करण्यासाठी महिलांनी शिक्षण घेऊन धैर्याने पुढे यावे.महिला सशक्तीकरण करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे.असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
महिला व बालविकास विभागाच्या वतीने नाशिकच्या कालिदास कलामंदिरात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ई पिंक रिक्षा वितरण यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, मनपा आयुक्त मनिषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे,
कायनेटिक कंपनीचे रितेश मंत्री, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, विष्णुपंत म्हैसधुने, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, प्रदेश पदाधिकारी गोरख बोडके यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व अंगणवाडी शिक्षिका सेविका, आशा सेविका व लाभार्थी महिला उपस्थित होत्या.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्याबाई होळकर या महिलांनी समाजसुधारणेत अतिशय मोलाचे योगदान दिले. देशाच्या इतिहासात देखील महिलांचे योगदान देखील अतिशय महत्वाचे आहे. पाच हजार वर्षांपासून महिलाना दुय्यम स्थान मिळाले आहे. मात्र या महिला समाजसुधारकांनी दिलेल्या योगदानामुळे आज महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना आपण बघत आहोत असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की,महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. त्यात काही अडचणी नक्की आहेत. मात्र राज्याचे उत्पन्न ज्याप्रमाणे वाढत आहे. त्याप्रमाणे लाभ हा महिलाना दिला जात आहे. शासनाकडून मंजूर करण्यात आलेले लाडक्या बहिणींचे पैसे हे महिलांना मिळतीलच. यामध्ये कुणीही शंका कुशंका निर्माण करू नये असेही ते म्हणाले. जी लहान मुले भारताचे भविष्य आहे. अशा मुलांच्या अंगणवाड्या झाडाखाली भारतात असे मला पालकमंत्री असताना समजल्या नंतर मी जिल्हा नियोजनमधून सर्व अखर्चित ४० कोटी रुपये जिल्ह्यात अंगणवाड्यांची निर्मिती करण्यासाठी दिल्याची आठवण त्यांनी सांगितली.
ते म्हणाले की, दिल्ली हाट च्या धर्तीवर नाशिकमध्ये कलाग्रामची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये १०० हून अधिक स्टॉल ची निर्मिती करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागाने ही जागा ताब्यात घेऊन या बचतगटांच्या महिलाना उपलब्ध करून देत ते सुरू करण्यात यावे अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. गोरगरीब महिलाना कलाग्राम उत्पन्नाचे महत्वाचे साधन असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आज महिला पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात काम करतांना बघावयास मिळत आहे. अगदी काल दहशतवादी स्थळे उध्वस्थ करण्यासाठी भारतीय सैन्याने सिंदूर ही मोहीम राबविली. या मोहिमेची सर्व माहिती आपल्याला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिली. यावरून भारतीय महिला आज किती सक्षमपणे काम करतेय याच उत्तम उदाहरण सर्व जगाने बघितले असल्याचे त्यांनी सांगितले.