मुंबई – बॉलिवूड मधील कलाकारांच्या प्रेम संबंधाबद्दल तसेच विवाह आणि रिलेशनशिप बद्दल नेहमीच चर्चा होत असते रसिकांना या कलाकारांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनाविषयी नेहमीच उत्सुकता वाटते. अनेकदा काही कलाकारांचे प्रेमसंबंध जमतात, त्यानंतर लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या जातात. प्रसंगी साखरपुडाही होतो, परंतु लग्नाच्या गाठी मात्र बांधल्या जात नाहीत ! त्यामुळेच कदाचित असे म्हटले जाते की, लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात किंवा निश्चित होतात. या कलाकारांच्या लग्नगाठी कदाचित निश्चित झाल्या नसाव्यात म्हणूनच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली असे दिसून येते.
सोशल मीडिया मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांची नावे एकमेकांशी जोडली जातात. या इंडस्ट्रीमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचे संबंध अनेकदा तयार होतात आणि बिघडताना दिसतात. बॉलीवूडमध्ये अशी अनेक जोडपी होती की, त्यांच्या नात्यामुळे खूप चर्चेत आली होती. मात्र, या जोड्यांचे नाते कधीच कायमचे जुळून आले नाही. बॉलिवूडच्या अशाच काही प्रसिद्ध जोडप्यांबद्दल जाणून घेऊ या जे लग्न जुळूनही विवाह करू शकले नाहीत.
अभिषेक बच्चन-करिष्मा कपूर
दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर, अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांनी २००२ साली एंगेजमेंट केले. तसेच अमिताभ बच्चन यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त या जोडप्याने अंगठीची देवाणघेवाण केली. तथापि, फेब्रुवारी २००३ मध्ये हा नियोजित विवाह रद्द करण्यात आला. हे नाते तुटण्याचे कारण करिश्माची आई बबिता होती. वास्तविक, अशीही बातमी समोर आली होती की, करिश्मा ही बच्चन कुटुंबात खूश राहणार नाही कारण लग्नानंतर तिने चित्रपटात काम करू नये अशी त्यांची इच्छा होती.
अक्षय कुमार-रवीना टंडन
बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार त्याच्या काळात अनेक अभिनेत्री सोबतच्या नात्यांबद्दल चर्चेचा विषय असायचा. यात अग्रक्रमात, रवीना टंडनसोबत जास्त चर्चा होती. त्यांच्या ब्रेकअपच्या अफवांवर अभिनेता अक्षयने बराच काळ मौन बाळगले. तथापि, काही वर्षांनंतर, त्याने उघड केले की रवीना टंडनसोबतची त्याची एंगेजमेंट रद्द झाली होती.
साजिद खान-गौहर खान
साजिद खानने २००३ मध्ये गौहर खानसोबत एंगेजमेंट केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्या वेळी दोघांचेही नाव प्रसिद्ध नव्हते. अशा परिस्थितीत त्यांचे नाते तुटल्याची बातमी पुढे आली नाही. परंतु या प्रकरणाची नंतर चर्चा झाली.
सलमान खान-संगिता बिजलानी
आभिनेता सलमान खान आणि संगिता बिजलानी यांच्या संबंधाबद्दल एकेकाळी खूप चर्चा होती. बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. मात्र संगीता बिजलानीसोबत त्याने जवळपास लग्न केल्याचे बोलले जाते, पण शेवटच्या क्षणी हे नाते तुटले. कारण, संगीताने सलमानला फसवणूक करताना पकडले होते. ‘कॉफी विथ करण’मध्ये या सुपरस्टारने त्याच्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्याचा खुलासा केला होता.