नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित राहू शकणार नाहीत. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ही माहिती दिली. भारत जोडो यात्रेत व्यस्त असल्याने पक्षाचे नेते राहुल गांधी हे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेस खासदार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी भारत जोडो यात्रा सोडणार नाहीत. संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जुन्या इमारतीत सुरू होऊन महिनाअखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. अधिवेशन ७ ते २९ डिसेंबर दरम्यान घेण्याचे प्रस्तावित आहे आणि तारखांबाबत अंतिम निर्णय संसदीय कामकाजावरील मंत्रिमंडळ समिती घेईल.
भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबर रोजी दक्षिणेकडील कन्याकुमारी, तामिळनाडू येथून सुरू झाली. ५२ वर्षीय राहुल गांधी यांनी केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये आपली नियोजित पदयात्रा पूर्ण केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात सहाव्या दिवशी शनिवारी सकाळी हिंगोली जिल्ह्यातील शेवळा गावातून पुन्हा सुरू झाली. सुमारे १५० दिवसांच्या या प्रवासात ३५७० किमी अंतर कापले जाईल. जम्मू-काश्मीरमध्ये संपण्यापूर्वी ते १२ राज्यांमधून जाईल. पदयात्रेदरम्यान महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत ३८२ किमी अंतर कापले जाणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात प्रवेश करेल.
जात जनगणना आणि आरक्षणाबाबत काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबद्दल विचारले असता जयराम रमेश म्हणाले की, “काँग्रेस पक्षाने २०१४ पासून या विषयावर सातत्याने तीच भूमिका ठेवली आहे. एससी/एसटी/ओबीसींच्या सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता सर्व समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाला काँग्रेस पाठिंबा देते.” त्याचवेळी, काँग्रेस नेत्याने जातीनिहाय जनगणना व्हावी ही पक्षाची मागणी आहे. मुख्य जनगणना झाली आहे, तेव्हा जातीची जनगणनाही गरजेची आहे. जर जात जनगणना झाली नाही, तर आरक्षण लागू करण्याचा आधार काय असेल. आरक्षण कोणत्या आधारावर आहे, याची माहिती द्यायला हवी, आणि ती अद्ययावत ठेवावी लागेल.”
Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Parliament Session