औरंगाबाद( इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुख्यालय वास्तव्याचा मुद्दा शैक्षणिक गुणवत्तेशी जोडून शिक्षकांविरुद्ध आरोपांची राळ उठवली आहे. या शिक्षक आणि शिक्षण विरोधी प्रवृत्तीच्या विरुद्ध आत्मसन्मानाची लढाई लढण्यासाठी औरंगाबादेत शिक्षक रस्त्यावर उतरत आहे. रविवार ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिक्षकभारतीने शिक्षक सन्मान रॅलीचे आयोजन केले आहे. रॅलीचे नेतृत्व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ.अंबादास दानवे, शिक्षकभारतीचे संस्थापक आ. कपिल पाटील, मराठवाडा शिक्षक आमदार मा. विक्रमजी काळे, नगरचे पदवीधर आमदार डॉ.सुधीर तांबे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण हे करणार आहेत. इतर शिक्षक संघटनांनी या रॅलीत सहभागी होण्याचे घोषित केल्यामुळे या लढ्यात जिल्ह्यातील सर्व शिक्षक एकजूट झाल्याचे चित्र आहे.
शिक्षकांच्या मुख्यालय वास्तव्याचा मुद्दा शैक्षणिक गुणवत्तेशी जोडून वस्तूस्थिती समजून न घेता शिक्षकी पेशावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे प्रयत्न सध्या काही घटकांकडून सुरू आहे. या विरुद्ध शिक्षकांमध्ये प्रचंड रोष आहे. शिक्षक अस्वस्थ आहे. या अस्वस्थतेला वाट मोकळी करून देत शिक्षक भारतीने पुढाकार घेऊन विशाल शिक्षक सन्मान रॅलीचे आयोजित केले आहे.
या शिक्षक सन्मान रॅलीत शिक्षकभारती ,शिक्षक सेना,राष्ट्रवादी शिक्षक संघ,जुनी पेन्शन हक्क संघटना,दिव्यांग कर्मचारी संघटना,अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना ,उर्दू शिक्षक संघटना, मुप्टा, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, प्रहार शिक्षक संघटना,प्राथमिक शिक्षक संघ,शिक्षक समिती, महाराष्ट्र शिक्षक संघटना,शिक्षक क्रांती संघटना,महा.राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन,केंद्र प्रमुख संघटना, मुख्याध्यापक संघ,या संघटनांनी सहभागी होण्याचे घोषित करत रॅली यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे. रविवार दिनांक ११सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आमखास मैदान येथून सुरू होणाऱ्या या विशाल रॅलीची सांगता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात होणार आहे. आत्मसन्मानाच्या या लढाईत सर्व शिक्षकांनी आपल्या अस्तित्वाचा लढा समजून विराट संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक शिक्षक भारती व सहभागी शिक्षक संघटनांनी केले आहे.