इंडिया दर्पण ऑलाईन डेस्क
शासनाच्या अंदाज समितीतील ११ आमदार धुळ्यात आले असून त्यांना देण्यासाठी पाच कोटी रुपये विश्रामगृहात आणण्यात आल्याचा दावा माजी आमदार अनिल गोटे यांनी केल्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत त्याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, आत्ताची ताजी खबर…विधिमंडळ आमदारांची अंदाज समिती आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आली असता, या समितीला मलिदा देण्याकरता जवळपास साडेपाच कोटी रुपये धुळे शासकीय विश्रामगृह गुलमोहर येथे रूम नंबर १०२ मध्ये जमा करण्यात आले होते. त्या ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सदरच्या रूमला कुलूप लावून पहारा ठेवला आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो या सर्वांना सूचना दिल्यानंतर देखील चार ते पाच तास उलटून गेल्यावर देखील कोणीही अद्याप आलेला नाही, प्रशासनाकडून कुठलेही सहकार्य मिळत नाही. विकास कामांमध्ये होणारा भ्रष्टाचार त्यामध्ये असणारा अधिकाऱ्यांचा सहभाग हे सर्व दाबण्याकरता या आमदारांना हा मलिदा देण्यात येत होता. शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर या समितीचे अध्यक्ष आहेत. उद्धव ठाकरे यांचे सरकार का पाडले? हा असा महाराष्ट्र लुटण्या साठीच!
तर दुस-या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रात नक्की काय सुरू आहे? धुळे विश्राम गृहात (no 102) राज्याच्या एका कैबिनेट मंत्र्याच्या वतीने काही दिवस वसुली सुरू होती. आज संध्याकाळी अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तेथे धडक देताच मंत्र्याचे पी ए खोलीस लॉक लावून पळून गेले.
खोलीत किमान ५ कोटी रुपये आहेत. कलेक्टरच्या उपस्थितीत खोली उघडावी एवढीच अपेक्षा आहे, पण सगळेच पळ काढत आहेत, चोरांचे सरकार…चोरांना सरंक्षण!