मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या चार दिवसांपासून कर्नाटक आणि आसाममध्ये पावसाने थैमान घातले असतानाच आता त्याचा मोर्चा महाराष्ट्राकडे वळाल्याचे दिसून येते. त्यामुळे येथे आठ दिवसात राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही भागात रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. विशेषतः गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला जोरदार पाऊस बरसणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
गेल्या रविवारपासून सतत तीन दिवस बंगळूर शहराला पावसाने जलमय करून टाकले असून मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. तसेच जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्र देखील अनेक ठिकाणी गेल्या तीन चार दिवसात ढगफुटी सदृश पाऊस पडला आहे. मंगळवारी देखील पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता पुन्हा एकदा राज्यावर पावसाची नजर वळणार असल्याचे सांगण्यात येते.
राज्यभरात गेल्या काही दिवसांमधील उघडीपीनंतर आज बुधवारपासून ( दि. ८ ) येत्या आठ दिवस म्हणजे १४ सप्टेंबपर्यंत संपूर्ण राज्यभरात विजा आणि गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, येत्या तीन दिवसांत गणपती विसर्जनदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. परतीच्या पावसासाठीची सुरुवात झाल्याचे अनुकूल वातावरणीय वेध सध्या स्थिरवल्यासारखे जाणवतात. त्यामुळे माघारी फिरणारा मोसमी पाऊस कदाचित वेळ घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
अरबी समुद्रामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होत असून वाऱ्यांची क्षमता सध्या मध्यम ते तीव्र आहे. मान्सून ट्रफचा पूर्वेकडील भाग दक्षिण दिशेने सरकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली. यासोबतच कर्नाटकच्या दक्षिणेकडे चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. सध्या बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीय वातस्थिती निर्माण होऊ शकते. या प्रभावाअंतर्गत त्यानंतरच्या ४८ तासांमध्ये पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. या प्रणालींमुळे राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले.
पालघर, ठाणे, मुंबई येथे येत्या शुक्रवारपासून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या पुढील पाच दिवसांच्या अंदाजानुसार शुक्रवारी अनंत चतुर्दशीला विसर्जनाच्या दिवशी मुंबईकरांना तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबईसह संपूर्ण कोकणात, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत विशेषत: जोरदार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक विभागातदेखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येत्या दोन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
8 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. येथे दर्शविलेल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदारची
शक्यता आहे.
IMD
Mumbai keep watching updates for coming week end pl. pic.twitter.com/7LVAAXc0GT— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 6, 2022
कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे बुधवारी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, मात्र गुरुवारपासून मुसळधार ते अती मुसळधार पावसाची तुरळक ठिकाणी शक्यता आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येथेही शुक्रवारी पावसाचा जोर वाढू शकतो. शुक्रवारी सातारा, परभणी, नांदेड येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात या दिवशी चंद्रपूर, गडचिरोली येथे ऑरेंज अॅलर्टही जारी करण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. कडक ऊन पडल्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते. सोमवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. कुलाबा, सीएसएमटी, भायखळा, मलबार हिल या भागांत मुसळधार पाऊस पडला. या भागात १० मि.मी. ते ४० मि.मी. पावसाची नोंद झाली. तर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात तुरळक सरी बरसल्या. गणेश विसर्जनाच्या (अनंत चतुर्दशी) दिवशी राज्याच्या सर्वच भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे, असा इशारा हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपि यांनी दिला आहे. या कालावधीत सतर्क राहावे, असेही हवामान विभागाकडून कळविण्यात आले आहे.
Alert for Very Heavy Rainfall in Maharashtra By IMD
Climate Weather