नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील पाच राज्यात निवडणुका जाहीर झाल्या असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे आगामी काळात जाहीर सभा- चौक सभा, बैठका, प्रचार यात्रा, आदींना जोर येणार आहे. परंतु दुसरीकडे देशभरात अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची वाढतांना दिसून येत आहे. त्यात गंभीर बाब म्हणजे येत्या काही दिवसात देशभरातील मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा धोका आणखी वाढणार असल्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
विशेषत: नवी दिल्ली, मुंबई, कानपुर, लखनऊ, चंदीगड, भोपाळ, कोलकत्ता अहमदाबाद, पुणे, ठाणे, हैद्राबाद, चेन्नई, पणजी, बंगळुरू यासारख्या शहरांमध्ये हा धोका मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांनी आप आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. देशातील संसर्गामध्ये झपाट्याने वाढ होत असताना, तज्ज्ञांनी पुढील आठवड्यापर्यंत दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये कोरोना प्रकरणांचा उच्चांक वर्तवला आहे. सध्या गेल्या वर्षी मे महिन्यानंतर देशात संसर्ग झपाट्याने पसरत आहे. गुरुवारी देशात 2.47 लाखांहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे.
महिनाभरापूर्वी दररोज येणाऱ्या प्रकरणांच्या तुलनेत ही संख्या दहापट आहे. ओमिक्रॉन प्रकार वेगाने डेल्टाची जागा घेत आहे. देशात आतापर्यंत 3.62 कोटी संक्रमित झाले आहेत. संसर्गाच्या बाबतीत भारत सध्या अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेषता आशिया खंडातील अन्य देशांच्या तुलनेत भारतात कोरोना संक्रमण वाढणार असून ओमिकॉनचा धोका अधिकच गडद होण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञ म्हणाले की, आमचे अभ्यास मॉडेल आणि इतरांचे संशोधन असे सुचवते की, भारतातील प्रमुख भारतीय शहरांमध्ये 20 जानेवारीच्या आसपास कोरोना बाधितांचा आकडा शिखरावर असू शकेल. तर संपूर्ण भारतात, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीला बाधितांचे प्रमाण सर्वोच्च दिसून येईल. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या शुक्रवारी संसर्गाची सर्वाधिक सुमारे 21 हजार नवे बाधित आढळून आले आहेत. परंतु गेल्या काही दिवासांपासून मुंबईत रुग्णांची संख्या कमी होत आहे. कोविड रुग्णालयांमध्ये जवळपास 80 टक्के खाटा रिक्त आहेत.
दिल्लीत गुरुवारी कोरोनाचे 28,867 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 22,121 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे 31 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी आशा व्यक्त केली आहे की येत्या काही दिवसांत येथे रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकेल. देशातील वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. मोदी म्हणाले की, ओमिक्रॉन पूर्वीच्या व्हेरियंटपेक्षा वेगाने पसरत आहे, ते जास्त संक्रमणक्षम आहे. आमचे आरोग्य तज्ज्ञ परिस्थितीचे मूल्यांकन करत आहेत. साहजिकच आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.