नाशिक – येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चांगलेच मानापमान नाट्य रंगत आहे. कार्यक्रम पत्रिका आणि त्यातील नावांनी आता चांगलेच डोके वर काढले आहे. निमंत्रण पत्रिकेत महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह भाजप नेत्यांची नावे नसल्याची बाब समोर आली आहे.
संमेलनाचे आयोजक असलेल्या लोकहितवादी मंडळाचे पदाधिकारी महापौरांना निमंत्रण देण्यास गेले पण यावेळी महापौरांनी खडे बोल सुनावले. केंद्रीय राज्यमंत्री व दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांचे नावही निमंत्रण पत्रिकेत नाहीत. भाजप नेत्यांना संमेलनात डावलल्याबाबत महापौरांनी चांगलीच आगपाखड केली आहे. भाजप आमदार, नगरसेवक आणि महापालिकेने संमेलनाला निधी उपलब्ध करुन दिली असताना अशा प्रकारची वागणूक मिळत असल्याने भाजपमध्ये नाराजी आहे. त्यामुळे भाजप नेते, नाशिक मनपा, नाशिकचे तिन्ही भाजप आमदार व केंद्रीय मंत्री डॉ. पवार हे संमेलनापासून चार हात लांब राहतात की त्यांचे मन वळविण्यात आयोजकांना यश येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.