नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष सागरानंद सरस्वती स्वामीजी यांचे महानिर्वाण झाले आहे. त्यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाल्याची भावना सर्वस्तरातून व्यक्त होत आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याची खडान खडा माहिती असलेले एक जाणकार संत परंपरेतील ज्येष्ठ श्रेष्ठ महात्मा, जुन्या पिढीतील एक तपस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून सागरानंद सरस्वती स्वामीजी यांची ओळख होती. अनेक दशके त्र्यंबकेश्वरात ते वास्तव्यास होते. प्रशासनासह विविध जणांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने त्यांचे नेहमीच मार्गदर्शन होते. सागरानंद सरस्वती स्वामीजी यांनी धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अतिशय महत्वाचे योगदान दिले. अतिशय महान कार्य करणाऱ्या श्री स्वामीजींचा भारतभरात मोठा शिष्य परिवार आहे. त्यांच्या निधनाने त्यांचा संपूर्ण भक्त परिवार पोरका झाला आहे.
दरम्यान, स्वामीजींच्या निधनाबद्दल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे. स्वामीजींच्या रुपाने पितृतुल्य व्यक्तिमत्व हरपले आहे. मी व माझे कुटुंबीय स्वामीजींच्या भक्तपरीवाराच्या दुःखात सहभागी असून त्यांच्या पवित्र स्मृतिस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.
Akhada Parishad President Sagaranand Saraswati Death
Religious Trimbakeshwar