रायपूर (छत्तीसगड) – ‘शोले’ चित्रपटात पाण्याच्या टाकीवर चढून अभिनेता धर्मेंद्रने केलेला ड्रामा सर्वांनाच माहिती आहे. त्याचप्रमाणे अनेक वेळा पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा मार्ग काही जण अवलंब करतात. छत्तीसगडमध्ये तर वेगळेच घडले. दोन आरोपी पाण्याच्या टाकीवर चढले, अन् ओरडून म्हणाले, अहो ऐका ! आधी मीडियाला बोलवा, मगच खाली उतरतो!
जांजगीर-चंपा जिल्ह्यात दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने हत्या केल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली देण्याची विचित्र पद्धत अवलंबली. ते गावात बांधलेल्या पाण्याच्या टाकीवर चढले आणि भागवताला आम्ही मारले आहे, असे जोरात सांगू लागले. त्या आरोपींनी पाण्याच्या टाकीवर शस्त्राने त्यांचा व्हिडिओ बनवला आणि इतर ग्रुपमध्येही शेअर केला. ग्रामस्थांनी माहिती दिल्यावरून पोलीस गावात पोहोचले. त्यांनी दोघांना पाण्याच्या टाकीवरून खाली उतरण्यास सांगितले, मात्र ते खाली उतरले नाहीत. आरोपींनी मीडियाला बोलावण्याचा आग्रह धरला. तेव्हा माहिती मिळताच काही प्रसारमाध्यमं पोहोचले तेव्हा आरोपी टाकीतून खाली उतरले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधल्यानंतर आरोपींनी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले.
सोहित कुमार केनवट आणि सुनील कुमार केनवट या दोन तरुणांनी जमिनीच्या वादातून गावातील पंच भागवत साहू यांची भरदिवसा हत्या केली. त्यांनी सांगितले की, पंच भागवत साहू यांनी त्यांची जमीन घेऊन फसवणूक केली आहे. आमच्यात ३३ लाखांचा सौदा झाला आहे, पण पैसे मिळालेले नाहीत. दोन वर्षांपासून भागवत आम्हाला पैशासाठी फिरत आहेत. त्यामुळे आम्ही त्याचा खून केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तुस्मा गावात या खुनाच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. तरुणांना शस्त्रे घेऊन जाताना पाहून अनेकांनी घराचे दरवाजेही बंद केले होते.