नवी दिल्ली – एअर इंडियाच्या खासगीकरणानंतर सरकार आता अलायन्स एअरसह इतर चार सहाय्यक कंपन्या, जमिनी आणि भवनांसारख्या १४ हजार ७०० कोटी रुपयांहून अधिक मालमत्तांचे पैशात रूपांतर करण्याचे (मॉनिटायझेशन) काम सुरू करणार आहे, असे दीपम अर्थात गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव तहिन कांता पांडे यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी टाटा समुहाने कर्जात बुडालेल्या नॅशनल कॅरिअर एअर इंडिया खरेदी करण्यासाठी १८ हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. यामध्ये २,७०० कोटी रुपयांची रोख रक्कम आणि १५,३०० कोटी रुपयांहून अधिकच्या कर्जाचा समावेश आहे.
तहिन कांता पांडे म्हणाले, की दीपम आता एअर इंडियाच्या सहाय्यक कंपन्यांच्या मॉनिटायझेशनसाठी एक योजना तयार करणार आहे. एअर इंडिया असेट होल्डिंग लिमिटेडच्या (एआयएएचएल) मालमत्तांचे पैशात रूपांतर करण्याची ही योजना असेल. ग्राउंड हँडलिंग, इंजिनिअरिंग आणि एलायन्स एअरची ही कंपनी असून, तिचे खासगीकरण करण्याचे नियोजन आहे.
सर्व सहाय्यक कंपन्या एकमेकांशी जोडलेल्या असल्याने त्यांच्या विक्रीची सुरुवात एकसाथ होऊ शकली नाही. एअर इंडियाची पूर्ण विक्री झाल्याशिवाय पुढील कारवाई होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. एअर इंडियाच्या विक्रीसाठी सरकारने २०१९ मध्ये एअर इंडिया समुहाचे कर्ज आणि इतर मालमत्तांचे व्यवस्थापन करण्यासाठी एअर इंडिया एसेट्स होल्डिंग लिमिटेडची स्थापना करण्यात आली होती.
३१ ऑगस्टपर्यंत एअर इंडियावर एकूण ६१,५६२ कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यापैकी टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड या टाटा सन्सची होल्डिंग कंपनीने १५३०० कोटी रुपये घेणार आहे. आणि उर्वरित ४६,२६२ कोटी रुपये एआयएएचएलला हस्तांतरित केले जातील.