नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाची बाजू मांडताना कपिल सिब्बल असे काही बोलले की त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं गेलं आहे. घटनापीठापुढे सिब्बल यांनी तब्बल अडीच तास युक्तिवाद केला आणि दिवस संपता संपता त्यांनी केलेलं विधान वाऱ्यासारखं संपूर्ण देशात पसरलं.
‘मी ही केस जिंकेन किंवा हरेन..त्यासाठी मी इथे उभा नाही. मी इथे उभा आहे घटनात्मक नैतिकता टिकून राहावी यासाठी, जी आपण 1950 पासून रुजवत आलो आहोत देशात.. यासाठी मी उभा आहे…’ असा युक्तिवाद करून सिब्बल यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. राज्यपालांनी घटनात्मक नैतिकता पाळली पाहिजे असे आपण म्हणतो, पण इथे नैतिकता कुठेच दिसत नाही, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख असताना राज्यपालांनी शिंदे यांना कोणत्या पदावर उपस्थित राहून मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली, असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला.
शिंदे गटाने आणि भाजपने राज्यपालांशी संपर्क साधल्यानंतर राज्यपालांनी सेनेला सिश्वासदर्शक ठराव मांडायला सांगितला. त्यांच्या ३९ आमदारांना गट म्हणून मान्यता दिली. तरीही बहूमत सिद्ध करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनाच देण्यात आले. एवढी तथ्य स्पष्ट असताना आणखी काही अर्थ लावण्याची गरज नाही, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. सरकार पडणार नाही याची खात्री करण्याचा मार्ग म्हणजे विश्वासदर्शक ठराव मांडणे होय. पण त्यांचे (शिंदे गट) आधीच ठरले होते. त्यामुळे ते गुजरात आणि आसामला गेले. राज्यपालांनी खरं तर तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात, असा सवाल करायला हवा होता, असाही युक्तिवाद सिब्बल यांनी केला.
तर नोटिशी रद्द कराव्या
आसाममधून प्रतोद निवडण्याची प्रक्रिया होऊ शकत नाही, ही बाब न्यायालयाला मान्य असेल तर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णयही रद्द करण्यात यावा. ठाकरे गटाच्या आमदारांना बजावण्यात आलेल्या नोटिशी न्यायालयाने अमान्य कराव्या, अशी मागणी सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली.
भावनिक विधान
सिब्बल यांनी अडिच तास पोटतिडकीने युक्तिवाद करताना शेवटच्या क्षणाला भावनिक विधान केले. आपण केस जिंकलो किंवा हरलो तरीही फरक पडत नाही. पण घटनात्मक नैतिकता टिकून राहण्यासाठी आपले प्रयत्न आहेत, असे सिब्बल म्हणाले.
Advocate Kapil Sibbal on Supreme Court Statement