चिपळूणचे संमेलन : पुरोगामी व प्रतिगामी विचारांचा सांस्कृतिक संघर्ष!
- संदेश पवार (चिपळूण जि. रत्नागिरी)
अवघ्या कोकणची सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळूण नगरीमध्ये ( जिल्हा रत्नागिरी ) 86 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक 11, 12 व 13 जानेवारी 2013 रोजी भरवण्यात आले होते . हे चिपळूणचे साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात अविस्मरणीय असे ठरलेले आहे . कारण अनेकविध प्रकारचे वाद, विवाद आणि त्यातून झालेली वैचारिक घुसळण , पराकोटीचा खर्च आणि त्यातूनही पार पडलेले दिमाखदार संमेलन , त्याला लाभलेली उस्फुर्त गर्दी , प्रतिसाद या सगळ्यामुळे चिपळूणचे संमेलन हे इतरांप्रमाणेच माझ्याही आठवणीतील एक अविस्मरणीय असे संमेलन ठरलेले आहे.
भारतीय समाजात नेहमीच पुरोगामी व प्रतिगामी विचारांचा कायम संघर्ष राहिलेला आहे . मग ते क्षेत्र कोणतेही असो . साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रातही हा संघर्ष नेहमी अटळ राहिलेला आहे. आणि त्याचीच परिणती चिपळूणमध्ये पार पडलेल्या 86 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात पहावयास मिळाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले हे होते . आपल्या ठाम वैचारिक भूमिकेबद्दल ते प्रसिद्ध आहेत . सुरुवातीलाच त्यांनी साहित्य संमेलन आणि राजकारणी याबाबत आपले मत व्यक्त करताना, साहित्य संमेलनात राजकीय लोकांच्या उपस्थिती बाबत सकारात्मक भूमिका मांडलेली होती . त्यामुळे त्यांच्या त्या भूमिकेचेही चर्चा होत राहिली.
शिवाय चिपळूणमध्ये हे संमेलन लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर या संस्थेने संमेलनाचे आयोजन केले होते. ही एक नामांकित संस्था आहे. मुळातच यानिमित्ताने स्वागत अध्यक्षपदावरूनच वादाला सुरुवात झाली होती . तत्कालीन मंत्री सुनील तटकरे, चिपळूणमधील स्थानिक आमदार भास्कर जाधव यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला होता, खरे पाहता ज्या जिल्ह्यात साहित्य संमेलन होत असते तेथीलच स्थानिक राजकीय नेत्याची स्वागत अध्यक्षपदी निवड करण्याचा प्रघात दिसून येतो. मात्र चिपळूणच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष रायगड मधून रोह्याचे असलेले सुनील तटकरे झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली होती . दोघेही एकाच राजकीय पक्षाचे असतानाही हा वाद लक्षणीय ठरला होता.
हा वाद संपतो न संपतो तोच साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवरूनही असाच मोठा गदारोळ उठला होता. याचे कारण संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर भगवान परशुराम यांचा फोटो व त्यांच्या हातातील परशु (कुर्हाड ) छापण्यात आली होती. याला पुरोगामी मंडळींनी विरोध केला होता. हा देखील वाद प्रचंड गाजला होता. खूप मोठी वैचारिक घुसळन यानिमित्ताने विविध माध्यमातून झाली होती.
अखेर आयोजक संस्थेने निमंत्रण पत्रिका रद्द करून मागे घ्यावी लागली. व नव्या निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या होत्या . मात्र तरीही हा वाद शमण्याची चिन्हे नव्हती. परशुराम समर्थक मंडळींनी या साऱ्यावर कडी करत संमेलनाच्या मुख्य मंचावरच भगवान परशुराम यांचा पुतळा दुसऱ्या दिवशी बसवला होता. यावरूनही खूप मोठा वाद निर्माण झाला होता. एका बाजूला साहित्याचा उत्सव सुरू असतानाच दुसर्या बाजूला हा सांस्कृतिक संघर्ष उभा ठाकलेला होता .
याखेरीज साहित्य संमेलनाच्या मुख्य विचारमंचाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावरूनही वाद उभा ठाकला. अनेकांनी त्यास विरोध केला. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर तोही वाद संपुष्टात आला. चिपळून शहरानजीक असलेल्या मिरजोळी या गावातील ज्येष्ठ साहित्यिक व मुस्लिम समाजसुधारणेचा वसा घेतलेले हमीद दलवाई यांच्या गावातून साहित्य संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्याचा कार्यक्रम आयोजक संस्थेने ठरवला होता, मात्र स्थानिक लोकांनी विरोध केल्यामुळे आयोजक संस्थेला हा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. मात्र तरीही पुरोगामी चळवळीतील नेते व कार्यकर्त्यांनी हमीद दलवाई यांच्या घरापासून संमेलनस्थळी ग्रंथदिंडी काढून आपला पुरोगामी विचार कायम जोपासला. शिवाय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांनी या ग्रंथ दिंडीचे स्वागत स्वतः करून या दिंडीला आपला खांदा दिला होता.
यात आणखी कमी होते की काय, म्हणून संमेलनाचा खर्च हा साधारण एक कोटीच्या आसपास केला जात असे. परंतु चिपळूणच्या साहित्य संमेलनाचा खर्च तीन कोटींहून अधिक झाल्याची चर्चा केली गेली . कला दिग्दर्शक नितीन सरदेसाई यांच्या सेटलाच सुमारे सव्वा कोटी रूपये खर्च झाल्याचे सांगितले जात होते, त्यामुळेही यावरून खूप मोठी टीकाटिप्पणी केली गेली .
साहित्य संमेलन आयोजक संस्थेचे मार्गदर्शक व दैनिक सागरचे संपादक कालकथित निशिकांत जोशी यांनी अत्यंत ताठर भूमिका घेऊन आयोजक संस्थेची बाजू ,त्यांच्या भूमिका ठासून मांडताना भगवान परशुराम यांचा पुतळा मुख्य मंचावर बसवणे, निमंत्रण पत्रिकेवर तो छापणे , परशु यासंबंधीची भूमिका त्यांनी आपल्या समारोपाच्या भाषणामध्ये अत्यंत कडवटपणे मांडली होती. त्यावर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटल्या होत्या. साहित्य संमेलन सर्व समाजाचे आहे , आणि त्यामुळे एक वेगळे वातावरण निर्माण झाले होते.
आणि त्याला उत्तर देताना संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांनी अतिशय संयतपणे व समर्पकपणे आपली भूमिका मांडली होती . ‘साहित्यपीठ हे सेक्युलरच असले पाहिजे’ तिथे कोणत्याही जाती ,धर्म, पंथाचे प्रतीके, प्रतिमा असता कामा नयेत, याचे भान सर्वांनीच राखायला हवे, अशी स्पष्ट भूमिका मांडली. आपली भूमिका विशद करताना महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज यांच्या विचारांचे दाखलेही दिले . त्यामुळे हे साहित्य संमेलन पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी विचारांच्या संघर्षाचे एक संमेलन बनले होते.
मात्र तरीही या सगळ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासियांनी, चिपळूनवासियांनी या संमेलनाचा पुरेपुर आस्वाद घेतला. संमेलनातील नियोजित सर्व कार्यक्रम ,परिसंवाद ,कविसंमेलने अतिशय दर्जेदार झाली. विविध राजकीय मंडळींची भाषणेही अतिशय खुमासदार झाली. विशेषतः कविवर्य अशोक नायगावकर यांनी सादर केलेल्या कविता सर्वांच्या लक्षात राहिल्या. या साहित्य संमेलनात पुस्तक विक्री देखील खूप मोठ्या प्रमाणात झाली होती. हजारो शालेय विद्यार्थ्यांनी संमेलनास उपस्थिती लावली होती. संमेलनाच्या निमित्ताने अवधी चिपळून नगरी नटली होती आणि विशेष म्हणजे अनेक विकासाची कामे त्यानिमित्ताने पूर्ण झाली होती. अशाप्रकारे 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आठवण सर्व रसिक व वाचकांच्या कायम स्मरणात राहिलेली आहे!
(लेखक मो. ७०६६०७८७५८. मुक्त पत्रकार तथा सामाजिक व राजकीय विषयांचे अभ्यासक)
(संकलन – प्रा. लक्ष्मण महाडिक)
सूचना – आठणीतील साहित्य संमेलन या सदरासाठी आपणही आपला लेख देऊ शकता. त्यासाठी 9422757523 या व्हॉटसअॅपवर लेख व फोटो पाठवावा.)