९१ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन ..बडोदा..
आम्ही ३/४ मैत्रिणी मिळून माझ्या स्वत:च्या गाडीने हौसेने संमेलनाला गेलो होतो. तसे ही मला नेहमीच संमेलनाला जायला आवडते , त्या ३/४ दिवसात जे वैचारिक खाद्य मिळते त्याने मी तृप्त होऊन जाते.संमेलनाच्या राजकारणाशी आपला काही संबंध नसतो , मी मिळवते तो निखळ आनंद …!
बडोदा .. राजाचं गाव .. आणि राजाच्या नावलौकिकाला शोभेल असे साहित्य संमेलन पाहून मन तृप्त झाले. अहो, ग्रंथ दिंडीच इतकी छान होती की बघत रहावी ..कपडे, त्यांचा थाटमाट, भव्य आणि दिव्य अशी ती ग्रंथदिंडी आम्ही पुरेपूर अनुभवली. शहरातल्या ५ स्टार हॅाटेलचे आमचे बुकिंग होते व हाताशी अलिशान गाडी .. मग काय ? नुसती मजा लुटायची …!
भव्य असा उद्घाटन समारंभ झाला. भव्य शामियाना अन सारी चोख व्यवस्था नि बडोदेकर अतिशय शांत नि सुसंस्कृत..! कुठेही गडबड गोंधळ नाही. लक्ष्मीकांत भट अध्यक्ष होते. महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्य नगरी दुमदुमली होती यात शंकाच नाही .३ दिवस अक्षरश: साहित्यिक मेजवानीचा आस्वाद आम्ही घेत होतो. परिसंवाद ,त्यांचे
विषय व बोलणारे वक्ते अतिशय अभ्यासपूर्ण बोलत होते. सभागृह खचाखच भरलेले असे. मुंगी शिरायला वाव नसे.
प्रत्येकच परिसंवाद दर्जेदार असल्यामुळे कुठे हजेरी लावावीअसा संभ्रम होत असे. बडोदा नगरी , राजवाडा ही पहायची उत्सुकता होतीच. जमेल तसा वेळ काढून बडोदा शहर व राजवाडा आम्ही पाहिला नि राजवाडा पाहून थक्क झालो. किती अलिशान जीवन जगत होते आमचे राजे महाराजे! धन्य झालो. गार्डन खूप मोठे आहे ते ही पाहिले.
परिसंवाद ते अध्यक्षिय भाषण.. दणकेबाज असे… आम्ही काहीही चुकविले नाही. कवि संमेलन बहारदार झाले.
आणि मग शेवटचा बडोद्याची खरी संस्कृती दाखवणारा बहारदार,भव्य,उत्तम गायिकांच्या व गायकांच्या गाण्यांनी
तृप्त करणारा कार्यक्रम कायमचा मनावर कोरला गेला. मुंबईच्या १९८१ च्या संमेलना पासून गोवा कोल्हापूर ते
यवतमाळ अशी संमेलने मी अनुभवली पण लक्षात राहिले ते बडोदा संमेलन सर्वच बाबतीत उजवे होते असे मला वाटते. लिहिण्यासारखे खूप आहे.. आता थांबते… आम्ही खूप ग्रंथ खरेदी केली. राजाचे खंडही विकत घेतले.
- प्रा. सौ. सुमती पवार
सारंग, वाघ गुरूजी शाळे समोर, पंपिंग स्टेशन रोड, गंगापूर रोड, नाशिक ४२२०१३
(९७६३६०५६४२) svpawar6249@gmail.com
संकलन -प्रा. लक्ष्मण महाडिक
(आपले अनुभव पाठविण्यासाठी संपर्क करा 9422757523)