मजेशीर घटनांचे तरंग
- अनिल निरगुडकर
मला लहानपणापासून मराठी कवितेची आवड होती. ग्वाल्हेरला मराठी शाळेत आम्हाला मराठीचे एक शिक्षक सर्व कविता चालीवर म्हणून दाखवायचे. मला त्यामुळे वेगवेगळ्या वृत्तात लिहलेल्या कवितेच्या चाली अजून लक्षात आहेत. 1962 साली ग्वालेहरला मराठी साहित्य संमेलन झाले होते. कुसुमावती देशपांडे पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या होत्या. साहित्य संमेलनाची बाल वयात झालेली पहिली ओळख होती.
2005 साली सर्वात प्रथम राष्ट्रीय पातळीवर कवी म्हणून नाशिक संमेलनात निवड झाली होती. ते भव्य कवी संमेलन अजून माझ्या स्मरणात आहे. पुढे मी महामंडळात 3 वर्ष प्रतिनिधी होतो व त्यातील 2 वर्ष उपाध्यक्ष होतो. प्रथम मराठी विश्व साहित्य संमेलन अमेरिकेत सेंहोझे(केलिफोर्निया) जवळ करण्याचे ठरले होते. ह्या साठी प्रस्ताव मी ठेवला व पुण्याचे मिलिंद जोशी हे अनुमोदक होते. महाराष्ट्रात ह्यावर खूप भयंकर वाद झाला. कार्यकारणीत ही कांही विरोधात होते. शेवटी तिथे जाण्याचा निर्णय झाला. माझ्या दोन्ही मोठ्या भावांच्या मुली अमेरिकेत असल्याने ते अनेकदा तिथे गेले होते. मला अशी सोय नसल्याने मी तिथे कधी जाऊ शकेन असं स्वप्नात ही वाटलं नव्हतं.
मी तिथे केलिफोर्नियात पोचल्यावर खूपच आनंद झाला. देश जरी दुसरा असला तरी घ्यायला सारे मराठी बंधू भगिनी आले होते. संमेलनात पहिल्या दिवशी ग्रंथ दिंडी काढतात तशी तिथे ही काढली होती. फक्त फरक एवढा ही दिंडी रस्त्यावर न काढता मैदानातच काढली होती. गेल्या बरोबर एक मजेशीर घटना घडली. मी रिषेप्शन वर मला कोणत्या रूम वर थांबायचं हे एका ला विचारले. तो म्हणाला तुम्ही निगुडकर न!. होय. मी म्हणालो. तो म्हणाला तुमची सोय प्रशांत दामले बरोबर केली आहे. मी त्यांना भेटलो कधीच नसलो तरी TV वर कार्यक्रमात बघितले असल्याने पटकन शोधलं.
प्रशांत दामले म्हणाले एक माझ्या जवळ अगोदरच आहे तुम्ही आता आमच्या दोघांच्या मध्ये झोपा असं म्हणत खूप हसले. माझ्या सोबत ते रिसेप्शन वर आले. मग गोंधळ समजला. माझ्या आडनावा सारखे दुसरे गृहस्थ हे त्यांचे रूम पार्टनर होते. पत्रकार उदय निरगुडकर, (मी अनिल निगुडकर) माझी सोय वरच्या मजल्यावर केली होती. ह्या गोंधळास ऐकून सर्व लोक खूप हसत होते.
अश्विनी भावे व भारत जाधव सारखे नावजलेले फिल्मी नट/नटी भेटले. तसेच सिंधू ताई सपकाळ – हृदयनाथ मंगेशकर ही भेटले. अनेक मोठे साहित्यिक ही भेटले. तिथे झालेल्या कवी संमेलनात मी एकटा कवी बृहन्महाराष्ट्र कडून होतो. इतर 9 कवी महाराष्ट्रातले होते. शँकर वैद्य अध्यक्ष होते. प्रवीण दवणे व अरुणा ढेरे ही तिथे होते. ह्या शिवाय पुणे व महाबळेश्वर संमेलनाच्या आठवणी ही मनांत आहे. पुण्यात अमिताभ बच्चन जवळ व महाबळेश्वर येथे आशाताई(आशा भोसले) जवळ बसता आले ह्या आठवणी नेहमी मनांत राहतील. संमेलनाच्या अनेक ठिकाणी गेलो असल्याने अनेक आठवणी आहे. पण मर्यादा लक्षात ठेवत इथेच थांबतो.