जळगाव- केळी हेच तर खरे कल्पवृक्ष आहे. जळगाव जिल्ह्याची ओळख केळीचे आगार म्हणून संपूर्ण जगात असणे अत्यंत गौरवाची बाब आहे. जळगावची केळी, नवतंत्रज्ञान, टिश्युकल्चरची केळी भारतात आणि भारता बाहेर प्रसिद्ध पावलेली आहे. याचे सगळे श्रेय जळगावच्या केळी उत्पादक भूमिपुत्रांना जाते. केळी उत्पादकांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे कार्य जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी केले व ते तंत्रज्ञान सगळ्यांना उपलब्ध करून दिले त्यामुळे आज जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्याने पिकविलेली केळी जीआय मानांकन मिळवून विश्वाच्या पटलावर आलेली आहे. येथील केळी उत्पादकांना याचे श्रेय द्यायला हवे म्हणूनच आपण डाक विभागाबरोबर पाठपुरावा करत केळीचे चित्र व माहिती असलेले पाकिट (इनव्हलप) आज प्रकाशित करीत आहोत, असे प्रतिपादन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.
विश्व टपाल दिनाचे औचित्य साधून जळगाव डाक विभागाने अशोकभाऊ जैन यांच्याहस्ते जळगाव केळी यावरील विशेष पोस्टाच्या पाकीटाचे प्रकाशन गांधी उद्यानात सकाळी करण्यात आले. व्यासपीठावर यावेळी ऑल इंडिया बनाना ग्रोवर्स असोसिएशनचे सचिव वसंतराव महाजन, जळगाव डाक विभागाचे अधीक्षक बी.व्ही. चव्हाण, निसर्गराजा कृषिविज्ञान केंद्र, तांदलवाडीचे अध्यक्ष शशांक पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. केळीला जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी, केळीला जीआय मानांकन मिळविण्यात शशांक पाटील यांचे प्रयत्न व जैन टिश्युकल्चरच्या गुणवत्तापुर्ण केळीची मिळालेली जोड आणि त्यास कृषि विभागाचेही मिळालेले सौजन्य या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत जळगाव जिल्ह्याची स्वतंत्र ओळख असलेल्या केळीला पोस्टाच्या पाकिटावर स्थान मिळाले याचा आनंद अशोकभाऊंनी व्यक्त केला.
ऑल इंडिया बनाना ग्रोअर्स असोसिएशनचे सचिव वसंतराव महाजन यांनी सांगितले की, जैन इरिगेशनचे संस्थापक डॉ. भवरलालजी जैन यांनी केळीमध्ये टिश्युकल्चर तंत्रज्ञान आणून केळीला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. केळी उत्पादक शेतकऱ्यांचा टपाल खात्याचा अगदी जवळचा संबंध आहे हे स्पष्ट करताना महाजन म्हणाले की, यावल, रावेर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पोष्टाच्या अल्पबचत दामदुप्पट योजनेची आठवण काढली. केळी उत्पादक पोस्टाच्या दामदुप्पट योजनेत आपले पैसे गुंतवणूक करीत असत व जळगाव जिल्ह्याचा महाराष्ट्रात बचत करण्यात पहिला नंबर लागत असे. त्या पोस्टाच्या पाकीटावर केळीचे चित्र व केळी तंत्रज्ञानाची माहिती प्रकाशित होणे हा केळी उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव असल्याचे त्यांनी सांगून केळी फळाचे महत्त्व सांगितले. दररोज एक केळी खा व चिरतरुण रहा असा मोलाचा सल्ला देखील महाजन यांनी दिला.
ज्यांनी केळीचे जीआय (जिऑग्राफिकल इंडेक्स) मानांकन केले असे तांदळवाडी निसर्गराजा कृषिविज्ञान केंद्राचे अध्यक्ष शशांक पाटील यांनी आधी स्वतःची ओळख सांगून मानांकन मिळविण्यासाठी काय करावे लागले ते सविस्तर सांगितले. दिल्लीला जीआय मानांकनासाठी केळीचे सादरीकरण करण्यासाठी आम्ही ५० किलोचा केळीचा घड रेल्वेने तेथे नेला. पाहणारे सारे आश्चर्यचकीत होऊन आमच्याकडे पाहात होते. तेथे १३ शास्त्रज्ञांसमोर हे सादरीकरण करतांना त्यांनी ही जैनची टिश्युकल्चर केळी आहे का अशी विचारणा केली, एवढी तिची ओळख तेथपर्यंत पोहचली होती. याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. नाशिक द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे तिथे द्राक्षाचे जीआय मानांकन झाले. जळगाव व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यातही केळी पिकविली जाते, त्या केळी इतर ठिकाणच्या केळीच्या तुलनेत रंग, रुप, चव आदीमधे फरक आहे. त्यामुळे ती जगभर प्रसिद्ध आहे म्हणून केळीसाठी जळगावला मानांकन घेणे गरजेचे होते. आपल्या जिल्ह्याची केळी व त्यामुळे बदललेले अर्थकारण याबाबत देखील आपल्या भाषणात त्यांनी प्रकाशझोत टाकला. चप्पल बुट हे एसीच्या दुकानात विकले जातात व केळी मात्र ठेल्यावर, उघड्यावर विकली जाते हे शल्य देखील पाटील यांनी बोलून दाखविले. यावेळी जळगाव डाक विभागाचे अधीक्षक बी. व्ही. चव्हाण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
हे जळगाव केळी वरील विशेष इनव्हलप गांधी रिसर्च फाऊंडेशनने जैन टिश्युकल्चर यांच्या मदतीने तयार केले आहे. याच्या ४००० प्रति करण्यात आल्या आहेत. लवकरच त्या जनसामान्यांसाठी गांधी तीर्थ आणि जळगावच्या टपाल कार्यालयात उपलब्ध होतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आश्विन झाला यांनी केले.