जळगाव – माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय निश्चितपणे दुर्दैवी आहे. त्यामुळे पक्षाला नुकसान आहेच. पण, ते क्षणिक आहे. शेवटी पक्ष कधीही थांबत नाही अशा शब्दात भाजपचे माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन यांनी खडसे यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची गेल्या काही दिवसापासून चर्चा होती. पण, बुधवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत खडसे यांच्या प्रवेशाची घोषणा केली. त्यानंतर खडसे यांनी सुध्दा पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर महाजन यांची प्रतिक्रिया आली आहे. महाजन म्हणाले की, नाथाभाऊचे पक्षवाढीसाठी योगदान मोठे राहिले आहे. त्यांनी आणि मी सोबत काम केले आहे. त्यांच्या कार्याला तोड नाही. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. नाथाभाऊंचा पक्ष सोडण्याचा निर्णय निश्चितपणे दुर्दैवी आहे.
महाजन व खडसे यांचा सुप्त वाद सर्वश्रूत आहे. त्यामुळे खडसे यांच्या निर्णयावर महाजन यांनी दिलेली प्रतिक्रिया सद्या चर्चेचा विषय ठरली आहे.