मुंबई – बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ’ स्थापन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत नोंदणी केलेल्या कामगारांना हत्यारे/अवजारे खरेदीकरीता पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची योजना आहे. मात्र ही योजना रद्द करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असून त्यास नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. याप्रकरणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारवर टीका केली आहे.
रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कामगार वर्गासाठी सुरू केलेली योजना तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावरून धोरणातला विरोधाभास स्पष्टपण दिसून येतो असे उपाध्ये यांनी म्हटले आहे. एकीकडे सरकार अधिकाधिक रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जनतेला देते मात्र दुसरीकडे कामगारांना आवश्यक असलेल्या सुविधा पूरविणारे योजना रद्दबातल करण्याचे धोरण अवलंबत आहे, तेव्हा हे सरकार दुतोंडी आहे अशी टीका उपाध्ये यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.